‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’मुळे ५३० कोरोना बाधित रुग्ण शोधण्यात यश

जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानातंर्गत जळगाव जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात तपासणी करण्यात आलेल्या नागरीकांमधील 530 व्यक्ती या कोरोना बाधित आढळून आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान 15 सप्टेंबर, 2020 पासून सुरू केली आहे. या मोहिमेचा शुभारंभ जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी तालुका धरणगाव येथे करण्यात आला. जिल्ह्यातील नागरीकांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रशासनाच्यावतीने जिल्हाभरात 3 हजार आरोग्य पथकांची नियुक्ती केली आहे. यात महानगरपालिकेच्या 134, जिल्ह्यातील 18 नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रातील 337 तर जिल्हा परिषदेच्या 2533 पथकांचा समावेश आहे.

या पथकात आरोग्य सेवकांसह स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व संघटनांनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान 50 घरांना भेटी देत असून ही पथके घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेण्यात येत आहे. ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येत आहे. तेथे कोविड 19 च्या तपासणीसाठी स्वॅब चाचणी घेण्यात येवून पुढील उपचार केले जात आहेत. जळगाव जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने दोन टप्प्यात 25 ऑक्टोबर 2020 पर्यंत सुरू राहणार आहे. यात पहिली फेरी 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून दुसरी फेरी 14 ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत होणार आहे. पहिल्या फेरीचा कालावधी 15 दिवसांचा असून दुसऱ्या फेरीचा कालावधी हा 10 दिवसांचा राहणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.

या पथकांमार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 20 लाख 23 हजार 742 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत आतापर्यंत जिल्हाभरात 60 हजार 787 इतके कोमॉर्बिड रुग्ण आढळून आले आहे. यापैकी 5 हजार 211 रुग्णांना उपचारासाठी, संदर्भ सेवाकरीता पाठविण्यात आले होते. यापैकी 2 हजार 730 रुग्णांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी 530 रुग्ण हे कोरोना बाधित आढळून आले आहे. हे रुगण विहित वेळेत आढळून आल्याने त्यांचेवर वेळेत उपचार होणार असल्याने त्यांच्या जिविताचा धोका टळणार असून त्यांचेपासून इतरांना होणारा संसर्ग रोखण्यासही मदत होणार आहे.

नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकांना सहकार्य करावे. बाहेर पडताना सतत मास्क वापरणे आवश्यक आहे. मास्क शिवाय घराबाहेर पडू नये. हात साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नयेत. कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्यास त्वरीत रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी, जेणेकरुन जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Protected Content