महास्वयंम वेबपोर्टलच्या उपक्रमांमुळे ५३ हजार लोकांना रोजगार

मुंबई वृत्तसंस्था । कोरोनाच्या संकटकाळात बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाइन रोजगार मेळावे व महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे ५३ हजार ०४१ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

ऑगस्टमध्ये १३ हजार ७५४ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार मिळाला, असे ते म्हणाले. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. यावर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हेसुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात.

राज्यात ऑगस्टमध्ये या वेबपोर्टलवर ३७ हजार ३२० इतक्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात सहा हजार ७१०, नाशिक विभागात पाच हजार ६८७, पुणे विभागात १२ हजार ५२३, औरंगाबाद विभागात सात हजार ०८८, अमरावती विभागात दोन हजार ३४९ तर नागपूर विभागात दोन हजार ९६३ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

ऑगस्टमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १३ हजार ७५४ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात दोन हजार १७७, नाशिक विभागात एक हजार ७६४, पुणे विभागात सहा हजार ३२०, औरंगाबाद विभागात दोन हजार ९३२, अमरावती विभागात ११० तर नागपूर विभागात ४५१ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले असे मलिक यांनी सांगितले.

Protected Content