महाविकास आघाडी सरकारचा मोठा घोटाळा बाहेर येण्याची भीती

मुंबई: वृत्तसंस्था । शिवसेना नेत्यांचे घोटाळ्यांमध्ये नाव येत असल्यानं त्याचा धोका कांग्रेसला असल्याची तक्रार विश्वबंधू रॉय यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. सरकारमध्ये कधीही नवा घोटाळा बाहेर येईल, अशी भीतीही रॉय यांनी पत्रात नमूद केली आहे.

महाविकास आघाडी सरकारला वर्ष पूर्ण झालं आहे आणि सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचा दावा तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र हे चित्र आभासी असल्याचं पुन्हा पुन्हा पाहायला मिळतं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची नाराजी सातत्यानं समोर येत आहे. मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू रॉय यांनी पक्षश्रेष्ठींकडे शिवसेनेविरोधात तक्रार केली आहे. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना तसं पत्रच रॉय यांनी दिलं आहे.

विश्वबंधू रॉय यांनी यापूर्वीही काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप रॉय यांनी केला होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबतची आघाडी पुढे चालून काँग्रेसला धोक्याची ठरु शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती.

महाविकासाआघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेसला सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात येत होता. नगरविकास खात्याकडून काँग्रेसच्या नगर पालिका आणि महानगर पालिकांना निधी कमी मिळाला असल्याचे सांगितले. मात्र, आगामी अर्थसंकल्पात ही त्रुटी दूर केली जाईल, असंही थोरात म्हणाले. आमच्याकडे असलेल्या खात्यांवरील अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील काही दिवसांपूर्वी काँग्रेच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे म्हटले होते.

उर्जामंत्री नितीन राऊत यांचा वीज बिलातील सवलतीचा प्रस्तावही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उदासीनतेमुळेच बारगळल्याची चर्चा आहे. वीज बिलात सवलत देण्यासाठी सरकारी तिजोरीत निधी नसल्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांना सांगण्यात आले. त्यामुळेच नितीन राऊत यांनी ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत वीज बिले भरावीच लागतील, अशी भूमिका घेतली होती.

Protected Content