महाराष्ट्रद्रोही भाजपचे षडयंत्र उघड झाले -सावंत

 

मुंबई : वृत्तसंस्था | भारतीय जनता पक्षाने लिहिलेल्या पटकथेनुसारच कंगना राणावत महाराष्ट्राची बदनामी करत होती, यावर शिक्कामोर्तब झाले असून महाराष्ट्रद्रोही भाजपचे षडयंत्र उघड झाले आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात सावंत म्हणाले की, सुशांत सिंग प्रकरणात कंगनाने घेतलेली भूमिका व बॉलिवूडमधील ड्रग्स माफियांबद्दल तिच्याकडे खूप माहिती आहे असा तिने आणलेला आव हा भाजपच्या इशा-यावरच होता. अद्यापही तिने एनसीबीला कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु जनतेच्या पैशातून भाजपने तिला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी तर कंगनाला झाशीची राणी म्हटले यावरून तिला भाजपचे राजकीय संरक्षण देखील प्राप्त होते. तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर केली.

मुंबई पोलिसांना माफिया म्हटले. महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत असे म्हटले. ती एवढ्यावरच थांबली नाही तपर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून अपमान केला. कंगना दररोज महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचा अपमान करत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते खुश होत होते. यातूनच त्यांचा महाराष्ट्रद्रोह स्पष्ट होतो. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या या कुटील कारस्थानाचा तीव्र निषेध करत असून राज्यातील जनता भाजपच्या या महाराष्ट्रद्रोहाला कदापी माफ करणार नाही असे सावंत म्हणाले.

Protected Content