महात्मा फुले दांपत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराची मागणी

अमळनेर, प्रतिनिधी | महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करा अशी मागणी ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने आमदार अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

देशात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून प्रतिकूल काळात सुद्धा स्त्री शिक्षणाचे महान कार्य केले. त्यांची तुलना होऊ शकत नाही. देशाच्या नव्या विचारात आणि सार्वजनिक शैक्षणिक सर्वांगीण विकासात या दाम्पत्यांचे फार मोठे योगदान आहे. यामुळे फुले दांपत्यास भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी राष्ट्रपतींना पाच हजार पोस्टकार्ड संपूर्ण राज्यातून ओबीसी असोसिएशनचे राज्य अध्यक्ष मा. विलासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठविण्यात आली होती. व त्यासाठी जिल्ह्यातून सह्यांची मोहीम राबविण्यात आली. यासाठी अनेक पुरोगामी विचारांच्या संघटनांनी मागणी केली आहे. त्याअनुषंगाने फुले दांपत्यास भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने आमदार अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी संपूर्ण भारतातील जनता मागणी करीत आहे. या बाबतीत निवेदन विविध माध्यमातून संघटनांनी महाराष्ट्र शासन व भारत सरकारकडे पाठवली आहेत.
आतापर्यंत काही व्यक्तीना भारतरत्न पुरस्कार देताना शासनाने निकषात बदल करुन दिला आहे. फुले दांपत्याचे एवढे मोठे कार्य असूनही दांपत्य सदर पुरस्कारापासून वंचित आहे. ही शोकांतिका आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्याचे आपण कार्यक्षम आमदार असल्या कारणाने हा प्रश्न उचलून धरावा व शासन दरबारी पोहचवावा अशी मागणी ओबीसी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष ईश्वर महाजन यांनी केली आहे. निवेदनावर महिला जिल्हाध्यक्ष वसुंधरा दशरथ लांडगे, तालुकाध्यक्ष सोपान भवरे, शहराध्यक्ष डी.ए सोनवणे, महिला तालुकाध्यक्ष भारती चव्हाण, जिल्हा कार्यकारणी सदस्य एन.आर चौधरी ,मनोहर पाटील, पक्षीमित्र अश्विन पाटील,समता शिक्षक परीषदेचे अजय भामरे, सल्लागार दशरथ सोमा लांडगे आदींनी सह्या केल्या आहेत.

Protected Content