मनसुख हिरेन हत्याकांडात नवा सुगावा

 

मुंबई: वृत्तसंस्था । मनसुख हिरेन हत्येचा तपास हाती घेतल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती नवीन माहिती लागली आहे. त्यामुळे सचिन वाझे यांनी मनसुख हिरेनची हत्या का घडवून आणली, याचा उलगडा झाल्याचे मानले जात आहे.

 

‘एनआयए’ने एका पोलीस कॉन्स्टेबल आणि एका हॉटेल व्यावसायिकाचा जबाब नोंदवून घेतला. हे दोन्ही जबाब आणि मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती याआधारे एनआयएने सगळा गुंता सोडवला आहे.

 

 

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर सचिन वाझे यांनी मनसुख हिरेनला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. मी तुला दोन-तीन दिवसांत जामिनावर बाहेर काढेन, असेही वाझे यांनी म्हटले होते. मनसुखने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली होती.

 

वाझे यांनी वारंवार सांगूनही मनसुख हिरेन तयार नव्हता. आपण ही केस डोक्यावर का घ्यावी, असे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मनसुख हिरेन घरी निघून गेला.

 

दरम्यानच्या काळात 2 मार्च रोजी  तपास  एसीपी नितीन अलकनुरे यांच्याकडे सोपवण्यात आला . तेव्हा नितीन अलकनुरे स्कॉर्पिओचा मालक म्हणून मनसुख हिरेनला चौकशीसाठी बोलावतील ही बाब स्पष्ट होती. नितीन अलकनुरे यांनी मनसुख हिरेनचा जबाब घेतला तर सर्व गोष्टी समोर येतील, अशी भीती सचिन वाझे यांना वाटली.

 

त्यामुळेच 4 मार्चला विनायक शिंदे याने बनावट सीम वापरुन मनसुख हिरेनला फोन केला. मी पोलीस अधिकारी तावडे बोलत असल्याचे सांगत त्याने मनसुखला घोडबंदर येथे बोलवून घेतले. त्यानंतर मनसुख हिरेनची हत्या करुन त्याचा मृतदेह खाडीत फेकून देण्यात आला. मनसुख हिरेन याने एसीपी अलकनुरे यांच्यासमोर खरा जबाब नोंदवू नये म्हणूनच सचिन वाझे यांना त्याचा काटा काढावा लागला, हे स्पष्ट झाले आहे.

 

राष्ट्रीय तपास यंत्रणेने मनसुख हिरेन हत्याप्रकरणात आणखी तीन जणांचे जबाब नोंदवले आहेत. आतापर्यंत 35 जणांनी जबाब नोंदवले आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुलीसंदर्भातही एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून काही पब, बार आणि हॉटेल मालकांचे जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे समजते.

Protected Content