मनसुख हिरेन मृत्यूच्या गुन्ह्यात एटीएसकडून दोघांना अटक!

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । मनसुख हिरेन मृत्यू  गुन्ह्यात  २ जणांना अटक करण्यात आली आहे. आधी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, चौकशीनंतर त्यांना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे.

राज्यात एकीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बची चर्चा असतानात दुरीकडे एटीएसनं मोठी कारवाई केली  निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश धरे या दोघांना एटीएसनं अटक केली आहे. 

मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला होता. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या कारमुळे मनसुख हिरेन यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं गेलं आणि त्यांचाच संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. सध्या जिलेटिन कांड्या प्रकरणाची चौकशी एनआयएकडून सुरू असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडून सुरू आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.

 मनसुख हिरेन यांच्या पत्नीने या प्रकरणात थेट सचिन वाझे यांच्यावर आरोप केले असून एनआयएनं अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणात सचिन वाझेंना अटक केली आहे. मनसुख हिरेन यांची कार सचिन वाझे वापरत होते, असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. सचिन वाझेंच्या निलंबनासोबतच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करून त्यांना होम गार्डची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 परमबीर सिंग यांनी शनिवारी दुपारी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामुळे सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. “गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना मुंबईतल्या बार आणि रेस्टॉरंटमधून कोट्यवधींची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं”, असा आरोप परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला आहे.

Protected Content