भुमीपूत्रालाच मुख्यमंत्री करणार; मोदींचं पश्चिम बंगालमध्ये आश्वासन

 

  कोलकाता : वृत्तसंस्था ।  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी भाजपा सत्तेत आल्यास  पश्चिम बंगालमधील   भुमीपूत्रालाच मुख्यमंत्री करणार असं आश्वासन दिलं आहे.

 

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये असून यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. येथील भूमीने ‘वंदे मातरम’च्या माध्यमातून देशाला एकत्र आणलं, पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांना बाहेरचे असं संबोधित करत असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

 

“बंगाल ही रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, बंकीमचंद्र चॅटर्जी अशा महान लोकांची जमीन होती आणि येथे कोणताही भारतीय बाहेरचा नव्हता. बंगालने ‘वंदे मातरम’च्या माध्यमातून देशातील जनतेला एकत्र आणलं. पण ममतादीदी बाहेरील लोक असा उल्लेख करत आहेत. कोणताही भारतीय येथे बाहरेचा नव्हता, सर्व भारतमातेची मुलं आहेत,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

 

“आम्हाला पर्यटक बोललं जात आहे, खिल्ली उडवली जात आहे, अपमान केला जात आहे. दीदी रवींद्रनाथ टागोरांच्या बंगालमधील लोक कोणालाही बाहेरचा समजत नाहीत,” असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

 

ममता बॅनर्जींसोबत आतले आणि बाहेरचे असा वाद  सुरु असतानाच नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य आलं आहे. ममता बॅनर्जी सतत बंगालमध्ये दिल्ली किंवा गुजरातमधून आलेल्या बाहेरच्या लोकांना राज्य करु देणार नाही असं सांगत आहेत. त्यालाच नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं आहे.

Protected Content