भारतात ५ महिन्यांतला कोरोना रुग्णसंख्येचा निच्चांक

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतात कोरोना संसर्गामध्ये मोठी घट झाली आहे. पाच महिन्यांनंतर, सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये २५,१६६ नवीन बाधितांची नोंद झाली ४३७ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

 

यापूर्वी १५ मार्च रोजी २४,४९२ रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३६,८३० लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

 

सुरुवातीपासून देशात एकूण तीन कोटी २२ लाख ५० हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख ३२ हजार ७९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी १४ लाख ४८  हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांपेक्षा कमी आहे. ३ लाख ६९ हजार रुग्ण सध्या उपचाराधिन आहेत.

 

देशातील दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये केरळमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळून येत आहेत. केरळमध्ये सोमवारी १२,२९४ नवीन बाधितांची नोंद झाली तर १४२ रुग्णांचा मृत्यू झाला. केरळमध्ये एकूण बाधितांची संख्या ३७ लाख २ हजारांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर मृतांची संख्या १८,७४३ झाली आहे.

 

राज्यात दैनंदिन आढळणाऱ्या नवीन बाधितांची संख्यी बरे होणाऱ्यांच्या तुलनेत कधी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात ५ हजार ८११ रूग्ण बरे झाले, तर ४ हजार १४५ नवीन बाधित आढळून आले. राज्यात आज १०० बाधित रूग्णांचा मृत्यू  झाला.

 

दरम्यान राज्यात यापूर्वी ६६ रुग्ण डेल्टा प्लस बाधित आढळले होते. सोमवारी आणखी दहा रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सहा, रत्नागिरीमध्ये तीन, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात एक रुग्ण आढळला आहे.

 

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १६ ऑगस्टपर्यंत देशभरात  लसीचे ५५ कोटी ४७ लाख ३० हजार डोस देण्यात आले आहेत. सोमवारी ८८.१३ लाख लसी देण्यात आल्या. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार, आतापर्यंत ४९ कोटी ६६ लाख  चाचण्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी १५.६३ लाख चाचण्या करण्यात आल्या, पॉझिटिव्हिटी दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Protected Content