भारतात कोरोनाच्या पुनर्संसर्गासाठी १०० दिवसांचा कालावधी

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाल्यनानंतर पुन्हा त्या रुग्णास दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा कालावधी १०० दिवस निश्चित करण्यात आला असल्याची माहिती आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिली. त्याचबरोबर देशात दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचे तीन रुग्ण आढळून आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भार्गव यांनी सांगितले की, भारतात कोरोनाच्या पुनर्संसर्गासाठी १०० दिवसांचा कालावधी लागत आहे. हा कालावधी म्हणजे अँटिबॉडीजचं जीवनमान आहे. अशा प्रकारची पुनर्संसर्गाची भारतात तीन प्रकरणं समोर आली असून यांतील दोन रुग्ण मुंबईतील तर एक अहमदाबादमधील आहे.

जागतीक आरोग्य संघटनेनुसार जगात सुमारे दोन डझन पुनर्संसर्गाची प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान, आम्ही आयसीएमआरचा डेटा तपासत आहोत. तसेच पुनर्संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत.

दरम्यान, आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, ४५ ते ६० वयोगट असणाऱ्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण ३५ टक्के आहे. आर्थिक घडामोडी सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर या वयोगटातील रुग्णांना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. भारतात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हा सातत्याने कमी होत आहे. दरम्यान, ८७ टक्के लोक करोनातून बरे झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

डेटामधून हे देखील समोर आलं आहे की, ४५ ते ६० वर्षे वयाच्या गंभीर आजार असलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक जोखीम आहे. या वयोगटात गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या कोरोनाच्या संसर्गाने मृत्यूचे प्रमाण १३.९ टक्के आहे, तर गंभीर आजार नसणाऱ्यांचे प्रमाण १.५ टक्के आहे. त्याचबरोबर ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्यांचे ५३ टक्के मृत्यू झाले आहेत. तसेच १७ ते २५ वयोगटातील मृत्यूचे प्रमाण १ टक्का आहे.

Protected Content