भाजप नेतृत्वाच्या अहंपणामुळेच ही वेळ — एकनाथराव खडसें

 

जळगाव: ‘ प्रतिनिधी । पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पारंपरिक मतदारसंघही भाजपने यावेळी गमावले. हे भाजपच्या नेतृत्वाचे अपयश आहे. भाजप नेतृत्वाच्या अहंपणामुळेच ही वेळ आली आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी टीका केली आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज शुक्रवारी जाहीर झालेत. या निकालाबाबत एकनाथ खडसे यांनी सांगितले की, या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर मतदारसंघातील जागा गेली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुणे मतदारसंघाची जागा गेली. कुणी पक्षातून बाहेर पडले म्हणजे पक्षाला काय फरक पडतो हे आता चंद्रकांत पाटील यांना कळेल. ते म्हणाले होते की हिमालयात निघून जाईन, आता मी तेच बघतोय ते हिमालयात निघून जातात का? असा चिमटा देखील खडसेंनी काढला. या निवडणुकीत सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीला यश आले. एका जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आला. परंतु, महाविकास आघाडीचे मतदान फुटले म्हणून आम्हाला विजय मिळाला, असे खुद्द भाजपने मान्य केले आहे. म्हणजेच सहाच्या सहा जागांवर भाजपची पिछेहाट झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही खडसेंनी सांगितले.

या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. भाजपच्या नेतृत्वाने या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी, असे सांगत खडसे म्हणाले की, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी मतदान केले आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला, म्हणजेच त्यांनी या सरकारच्या वर्षभरातील कामकाजाचे मूल्यमापन केले असेलच. पूर्वीच्या भाजपच्या सरकारकडून या सुशिक्षित मतदारांनी काहीतरी अपेक्षा व्यक्त केल्या असतील आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील म्हणूनच आता महाविकास आघाडी सरकारला कौल मिळाला. या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता व नाराजी निर्माण झाली आहे. ही नाराजी भविष्यात समोर येईलच, असेही खडसे म्हणाले.

Protected Content