पुढील सहा ते आठ आठवड्यात तिसरी लाट टाळता येणं अशक्य

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतात पुढील सहा ते आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असून ती टाळता येणं अशक्य असल्याचं एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

 

देशातील अनेक भागांमध्ये  निर्बंधांनंतर शिथीलता आणत अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना रणदीप गुलेरिया यांनी   हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं मोठं आव्हान असून कोव्हिशिल्डमधील अंतर वाढवणं त्यासाठी वाईट पर्याय नसल्याचंही सांगितलं आहे.

 

यावेळी त्यांनी डेल्टा प्लस विषाणूसंबंधी बोलताना विषाणूंच्या परिवर्तनाचा पुढील अभ्यास करण्यासाठी  नव्याने रुपरेषा आखण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. “आपण अनलॉक करत असताना पुन्हा एकदा लोकांकडून  सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून आपण धडा घेतलेला दिसत नाही. पुन्हा एकदा गर्दी होत आहे, लोक एकत्र येत आहेत. राष्ट्रीय स्तरावर रुग्णसंख्या वाढण्यास काही वेळ लागेल. पण तिसरी लाट अपरिहार्य असून पुढील सहा ते आठवड्यात येऊ शकते…जास्त काळही लागू शकतो,” असं यावेळी रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

 

आपण गर्दी रोखण्यासाठी  काय भूमिका घेतो यावर सगळं अवलंबून आहे. देशातील पाच टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस मिळाले असून वर्षअखेरपर्यंत १०८ कोटी लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य आहे.

 

“लसीकरण हे मुख्य आव्हान आहे. नवी लाट तीन महिन्यांचा कालावधी घेऊ शकते, पण इतर गोष्टींवर अवलंबून असल्याने ही वेळमर्यादा कमीदेखील होऊ शकते. गेल्यावेळी नवा विषाणू जो बाहेरुन आला आणि येथे विकसित झाला यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. हा विषाणू सतत बदलत राहणार आहे. हॉटस्पॉटच्या ठिकाणी आक्रमकपणे काम करण्याची गरज आहे,” असं रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

Protected Content