पीक विम्याचे निकष आधीप्रमाणेच असावेत-नंदू महाजन यांची मागणी

रावेर प्रतिनिधी । पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेतील केळी पिकाच्या निकषामध्ये गत वर्षी तापमानासाठी ५ दिवसांचा असलेला निकष यावेळी १५ दिवसाचा केल्याने या योजनेचा शेतकर्‍यांना शून्य लाभ होणार असल्याने निकष पूर्वीप्रमाणेच करावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत राज्यात फळ पिकासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना राबविण्यात येते. मागील पाच वर्षात उन्हाळ्यासाठी जास्तीत जास्त ४५ अंश सेल्सियस तापमान व हिवाळ्यासाठी कमीत कमी ८ अंश सेल्सियस तापमानाचा पाच दिवसाचा निकष लावण्यात आलेला होता. केळीच्या फळ पिक विम्यासाठी गेल्या वर्षी असलेल्या निकषात यावर्षी शासनाने बदल केला असून निकषाचा बदल केळी उत्पादक शेतकर्‍यांवर अन्यायकारक आहे. आतापर्यंत दरवर्षासाठी लागू असलेली ही योजना निकषात बदल करीत यावर्षीपासून २०२० ते २०२३ अशी तीन वर्षासाठी लागू केलेली आहे. तर उन्हाळ्यातील व हिवाळ्यातील तापमानाचे निकष ५ दिवसावरून १५ दिवस केले आहे, केळीसाठी मागील वर्षाप्रमाणेच सर्व निकष ठेवावेत अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Protected Content