पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना नोटीसा; तहसिलदार कैलास चावडे यांची माहिती

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील अपात्र १ हजार २०० लाभार्थ्यांना महसूल विभागाकडून नोटीस देण्यात आल्याची माहिती तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली आहे.

केंद्र शासनाची पंतप्रधान किसान सन्मान ही योजना संपूर्ण देशात कार्यान्वित असुन तालुक्यातील १ हजार २०० लाभार्थ्यांना तहसिल विभागामार्फत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्या पासुन १५ दिवसांचे आत घेतलेल्या लाभाची रक्कम जमा करण्याचे नोटीसमध्ये नमुद करण्यात आले असुन रक्कम न भरल्यास महाराष्ट्र जमिन महसुल कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटीसीद्वारे सुचित करण्यात आले आहे.

केंद्राने पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. शासनाच्या निकषांप्रमाणे जे शेतकरी आयकर भरत असतील ते या योजनेस अपात्र आहेत. त्यानुसार केंद्र शासनाने पात्र लाभार्थ्यांपैकी तालुक्यातील आयकर भरणाऱ्या १ हजार २०० शेतकऱ्यांना जळगांव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाचोरा तहसिल कार्यालयामार्फत नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस बजावल्या पासुन १५ दिवसांचे आत रक्कम जमा न केल्यास महाराष्ट्र जमिन महसुल संहिता १९६६ मधील सक्तीच्या वसुली संदर्भातील तरतुदी व नियमांचा उपयोग करुन वसुलीची कार्यवाही करण्यात येईल. तसेच देय रकमांच्या वसुली करीता इतर कायद्यानुसार देखील कारवाई करण्यात येणार असल्याचेही तहसिलदार कैलास चावडे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

Protected Content