मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र विधानसभेचे जुलैमध्ये होणारे पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्टपासून सुरु होणार होते. मात्र आता अधिवेशन ७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले असून, आता अधिवेशन ७ सप्टेंबर २०२० रोजी बोलाविण्यात येईल, असा निर्णय आज विधान भवन मुंबई येथे झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. येत्या ३ ऑगस्टपासून सुरू होणार्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलले गेले आहे. तत्पूर्वी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून रोजी होणार होते. मात्र कोरोनामुळे ते पुढे ढकलून ३ ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरले होते. अधिवेशनाच्या काळात विधानभवनात लोक गर्दी करतात. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असतो. तसेच प्रशासकीय कामासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचारी विधानभवनात असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतक्या लोकांनी एकत्र येणं धोकादायक ठरेल. त्यामुळे कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीत अधिवेशन पुढे ढकलण्याच निर्णय घेण्यात आला आहे.