पाकिस्तानातील एधी फाउंडेशनची भारतात ५० रुग्णवाहिकांसह डॉक्टर्स , स्वयंसेवक पाठवण्याची तयारी !

 

 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था । भारतातील गंभीर परिस्थिती पाहून पाकने मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तानमधील सेवाभावी संस्था एधी फाउंडेशनने भारताला ५० रुग्णवाहिका देण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिलं आहे. पाकिस्तानमध्ये सध्या एधीच्या या पुढाकारासाठी संस्थेचं कौतुक केलं जात आहे.

 

एधी फाउंडेशनलाचे कार्यकारी व्यवस्थापक आणि ट्रस्टी फैजल एधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. हे पत्र व्हायरल झालं आहे. “आम्ही भारतातील कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. कोरोना आणि त्याचा भारतींयांवर होणारा परिणाम याकडे आमचे सातत्याने लक्ष आहे. या  महामारीचा तुमच्या देशावर झालेल्या गंभीर परिणासंदर्भात आम्हाला चिंता आहे. भारतामध्ये अनेकांना संकटाला तोंड द्यावं लागत आहे. संकटाच्या काळात शेजारी आणि मित्र म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्याकडून भारतामध्ये ५० रुग्णावाहिका पाठवू इच्छितो. रुग्णावाहिकांसोबतच त्यासंदर्भातील सेवा आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो,” असं या पत्रामध्ये म्हटलं आहे.

 

“मी फैजल एधी, एधी फाऊण्डेशनचा कार्यकारी ट्रस्टी स्वत: माझ्या संस्थेतील एक टीम भारतामध्ये मदतीसाठी पाठवू इच्छितो. सध्याची परिस्थिती गंभीर आहे याची आम्हाला जाणीव असल्यानेच आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. यामध्ये तुमच्या नियोजनात आमची काही अडचण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. त्यामुळेच आमच्याकडून पाठवण्यात येणाऱ्या रुग्णावाहिकांसोबत आम्ही स्वयंसेवकांची टीमही पाठवू,” असंही या पत्रात म्हटलं आहे.

 

पाकिस्तानमधून पाठवण्यात येणारी ही टीम स्वत: सोबत सर्व सामान घेऊन येणार असून भारताकडून केवळ परवानगी हवी असल्याचं म्हटलं आहे. “आम्हाला ही योजना राबवताना भारताकडून काहीच नकोय. आम्ही आमचे इंधन, जेवण आणि इतर गोष्टी टीमसोबत पाठवू. आमच्या टीममध्ये आरोग्य सेवेतील अधिकारी, इतर अधिकारी, चालक आणि सपोर्टींग स्टाफ असतील,” असं पत्रात नमूद केलं आहे.

 

“तुम्ही आम्हाला केवळ भारतात येण्याची परवानगी द्या आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्य मिळेल यासंदर्भातील सूचना करा. तुम्ही सांगाल त्या प्रदेशांमध्ये आम्ही आमच्या टीम पाठवण्यास तयार आहोत. तुमच्या सांगण्यानुसाच आम्ही काम करु, आम्हाला केवळ परवानगी द्या. संकटाच्या प्रसंगामध्ये मदत करण्याची आमची इच्छा आहे. आम्हाला शक्य असेल त्या माध्यामातून आम्ही तुम्हाला मदत करु इच्छितो. आमच्या मदतीमुळे भारतीय नागरिकांना दिलासा  मिळणार असेल तर तुम्ही म्हणाल ती मदत करायला आम्ही तयार आहोत,” असंही एधी यांनी म्हटलं आहे.

 

पाकिस्तानात जवळपास एका दशकाहून अधिक काळ वास्तव्य केल्यानंतर २०१५ साली भारतात परतलेली मूकी व बहिरी असलेल्या गीताची देखभाल पाकिस्तानमध्ये एधी फाउंडेशननेच केली होती. गीता भारतात परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिची भेट घेऊन पाकिस्तानात तिचा सांभाळ करणाऱ्या एधी फाउंडेशनला एक कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती.

 

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय उपकरण, ऑक्सिजन याची उणीव भासत आहे. रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. अत्यवस्थ रुग्णांची रुग्णालयाबाहेर रांग लागली आहे. अनेकांना बेड मिळत नाही. त्यामुळे उपचाराअभावी प्राण गमवावे लागत आहेत. दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारताचं सांत्वन करणारं ट्वीट केलं आहे.

 

संकटात सापडलेल्या भारतातील नागरिकांच्या संवेदना समजू शकतो. पीडित शेजारी आणि जगभरातील लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. ते लवकर बरे व्हावे. माणुसकीच्या नात्याने या जागतिक संकटाला तोंड देणं आवश्यक आहे’, असं ट्वीट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.

 

 

दुसऱ्या लाटेशी सामना करण्याऱ्या भारतीयांसोबत आम्ही आहोत. आम्ही पाकिस्तानच्या नागरिकांकडून प्रभावित कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो. या संकटात मानवतेची विचारधारा लक्षात ठेवली पाहीजे. राजकारण बाजूला ठेवून संकटाशी सामना केला पाहीजे. पाकिस्तान सार्क देशांसोबत एकत्र येऊन या संकटाशी सामना करण्याचं कार्य सुरुच ठेवणार’ असं ट्वीट पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी केलं आहे.

 

Protected Content