पहिल्याच पावसात भरले जलक्रांतीचे खड्डे, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

फैजपूर, प्रतिनिधी । येथील धाडी नदीपात्रामध्ये पाणी अडवण्यासाठी तीन मोठे खड्डे करण्यात आले होते. ते खड्डे पहिल्या पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहू लागल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गेल्या पंधरवड्यात महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून येथील धाडी नदीपात्रामध्ये पाणी अडवण्यासाठी तीन मोठे खड्डे करण्यात आले होते. ते खड्डे पहिल्या पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहू लागल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनी समाधान व्यक्त केले. मागील दोन वर्षांपूर्वी जलक्रांती अभियानाअंतर्गत केलेल्या खड्ड्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फायदा झाला. त्यांच्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली होती. त्यावेळी हे खड्डे तीन वेळा पूर्ण भरून पाण्याचा जमिनीतील निचरा झाला. यावर्षीही परिसराचे प्रांत कैलास कडलक, सर्कल जे.डी. बंगाळे यांच्या पूर्वपरवानगीने नगरपालिका पाणी शुद्धीकरण केंद्राच्या पाठीमागे तसेच स्मशाभूमी मागे धाडी नदीपात्रात खड्डा खोदकाम करण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने या कार्यात भाग घेऊन सहकार्य केले.

नागरिकांना सावधानतेचा इशारा
धाडी नदीपात्रात तीन ठिकाणी खड्डे खोदून पाणी अडवण्यात आले आहेत. या ठिकाणी खड्ड्यांची खोली जास्त असल्यामुळे नागरिकांनी जाऊ नये. गुरे-ढोरे तसेच बकऱ्या चारनाऱ्यानी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे महाराजांनी केले आहे.

Protected Content