नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नीट परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या १५ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे ८५ ते ९० टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे नीट परीक्षा रविवारी १३ सप्टेंबररोजी आयोजित करण्यात आली होती. जे विद्यार्थी नीट २०२० परीक्षेत उत्तीर्ण होऊन आवश्यक ते कट ऑफ गुण मिळवतील, त्यांना काउन्सेलिंगसाठी बोलावले जाईल आणि प्रवेश मिळेल. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरद्वारे नीट परीक्षेच्यचा उपस्थितीसंदर्भातील माहिती दिली.
नीट परीक्षेसाठी यावर्षी परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली होती. नीटच्या आयोजनासाठी एनटीएला खूप तयारी करावी लागली. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी विविध राज्य सरकार आणि रेल्वेने मदत केली.
ही परीक्षा आधी ३ मे रोजी होणार होती, कोविड १९ मुळे ती दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. २६ जुलै आणि १३ सप्टेंबरला ही परीक्षा होणार होती, पण दोन्ही वेळ ती लांबणीवर पडली.मुंबईत या परीक्षेचे केंद्र ऐनवेळी बदलण्यात आले आणि त्याबाबत पालकांना व्यवस्थित माहिती न दिल्याने मोठा गोंधळ उडाला होता. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) केलेल्या या चुकीबद्दल अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली.
जेईई मेन परीक्षेला ८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ६ लाख ३५ हजार विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. म्हणजेच २ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली.