धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हनुमान नगरात राहणाऱ्या ४० वर्षीय प्रौढ व्यक्तीचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजू किसन पवार (वय-४०) रा. चितोड जि.धुळे ह.मु. हनुमान नगर, जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील वाघ नगरपरिसरातील हनुमान नगरात राजू पवार हे आपल्या पत्नी व मुलासह वास्तव्याला होते. सेंट्रींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे बुधवारी ३१ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पिंप्राळा येथे काम आटोपून ते घरी येण्यासाठी निघाले होते. शिरसोली ते जळगाव दरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक (४१५- २५ ते २७) च्या दरम्यान रेल्वे रूळ क्रॉस करत असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक हर्षल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गुरूवारी १ मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी मिनाबाई, मुलगा सुनिल, एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस नाईक हर्षल पाटील करीत आहे.

Protected Content