हैदराबाद (वृत्तसंस्था) भोनगीर परिसरातील एका हॉटेलमध्ये नवविवाहित दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोघांनी तीन दिवसापूर्वीच प्रेमविवाह केला होता. परंतू दोन्ही कुटुंबातील संबंध खराब झाल्यामुळे प्रेमीयुगलाने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
पती आणि पत्नी दोघेही एकाच समाजाचे आहेत. त्याचा प्रेमविवाह होता. त्यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबांचा विरोध होता. त्यामुळे कुटुंबियांना न कळवता तीन दिवसांपूर्वी त्यांनी लग्न केले. त्यानंतर हैदराबादमधील भोनगीर येथील हॉटेलमध्ये हे जोडपे थांबले. नवविवाहित जोडप्याने हॉटेलच्या रुममध्ये विष प्राशन केले. पतीचा जागीच मृत्यू झाला होता. तर बेशुद्धावस्थेत असलेल्या विवाहितेला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दोन्ही कुटुंबातील संबंध खराब झाल्यामुळे त्यांनी सोमवारी रात्री आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.