दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

 

मुंबई : वृत्तसंस्था । गृहमंत्री अनिल देशमुख  यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे.

 

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.

 

 

मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी  सीबीआनं १५  दिवसात पूर्ण करावी, असा निर्णय कोर्टान दिला.यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला. अनिल देशमुख यांनी त्यापूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांची सिल्वर ओक वर भेट घेतली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत राजीनामा दिला.

 

मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा  व गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, अशी विनंती केली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या कामागर आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याचा कार्यभार होता. महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. वळसे पाटील यांनी यापूर्वी विधानसभा अध्यक्षपद देखील भूषवले होते. त्या अनुभवाचा फायदा महाविकासआघाडीला झाला होता.

Protected Content