तृणमूल काँग्रेसची गळती थांबेना ; आता वनमंत्र्यांचा राजीनामा

कोलकाता: वृत्तसंस्था । आधी सुवेंदू अधिकारी यांच्यासह काही खासदार आणि आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आता थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी राजीनामा दिला आहे.

वनमंत्र्याने थेट राज्यपालांकडेच राजीनामा सोपवला आहे. राजीव बॅनर्जी हे भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता असून त्यांचा राजीनामा हा ममता बॅनर्जींसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

पश्चिम बंगालचे वन मंत्री राजीव बॅनर्जी काही महिन्यांपासून नाराज होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा ममता बॅनर्जी यांच्याकडे पाठवला. त्यानंतर राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सोपवला. साधारणपणे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांना पाठवायचा असतो. परंतु, राजीव यांनी मुख्ममंत्र्यांकडे राजीनामा पाठवून दुसरं राजीनामा पत्रं घेऊन थेट राजभवन गाठलं. यावरून त्यांना ममता बॅनर्जी यांच्याशी कोणतीही चर्चा करायची नसल्याचं स्पष्ट होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राजीव बॅनर्जी यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या ३० आणि ३१ जानेवारी रोजी गृहमंत्री अमित शहा बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राजीव बॅनर्जी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असं सूत्रांनी सांगितलं. मात्र, त्याला अद्याप कुणी दुजोरा दिलेला नाही.

राजीव बॅनर्जी बऱ्याच काळापासून पक्षात नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्याचा पक्षातून प्रयत्नही झाला होता. मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी त्यांच्यासोबत तीन बैठकाही घेतल्या होत्या. मात्र, त्यातून कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे अखेरीस राजीव बॅनर्जी यांनी राजीनामा दिला. गेल्या काही काळापासून त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकांनाही दांड्या मारल्या होत्या. दरम्यान, सुवेंदू अधिकारी यांच्याप्रमाणेच राजीव बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ हावडासह राज्यातील इतर भागात पोस्टरबाजी सुरू झाली आहे.

यापूर्वी सुवेंदू अधिकारी आणि क्रीडा राज्यमंत्री लक्षमी रतन शुक्ला यांनी ममता बॅनर्जी मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज राजीव यांनी राजीनामा दिला. सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जींवर सातत्याने टीका केली आहे. तर, राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडलेल्या शुक्ला यांनी अद्याप त्यांचे पत्ते खोलले नाहीत.

सलग तिसऱ्या मंत्र्याने राजीनामा दिल्याने ममता सरकारची डोकेदुखी वाढली असली तर राजीव बॅनर्जी यांच्या राजीनाम्याला महत्त्व न देण्याचा निर्णय टीएमसीने घेतला आहे. राजीव बॅनर्जी राजीनामा देतील हे आम्हाला आधीच माहीत होतं. त्यांच्या राजीनाम्याने पार्टीला काहीही फरक पडत नाही, असं टीएमसीचे ज्येष्ठ खासदार सौगत राय यांनी सांगितलं

Protected Content