ठाकरे सरकारला अपयशी ठरविण्याचा प्रयत्न ; संजय राऊत यांचा आरोप

मुंबई, वृत्तसेवा । कोरोना विषाणूच्या संकटात देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. या कालावधीत अनेक मजूर, कामगार मुबंईत अडकून पडले होते. त्यांना हाताला काम नसल्याने मुबंईत राहणे अश्यक्य झाले होते. यामुळे मिळेल त्या मार्गाने, वाहनाने किंवा पायी आपली घरची वाट धरली. या काळात त्यांना अनेक समस्यांना सामना करावा लागला. या दरम्यान, अभिनेता सोनू सूदने या मजुरांना मदतीचा हात दिला आणि शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची त्याने सोय केली. मात्र सोनूवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील ‘रोखठोक’मधून निशाणा साधला आहे. सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी सोनूवर निशाणा साधताना म्हटलं की, “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले. ‘लॉक डाऊन’ काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते? सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यांत पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारांनी काहीच केले नाही. या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महात्मा सूद यास शाब्बासकी दिली.”

एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय? राज्याराज्यांची सरकारे या स्थितीत हतबल झालेली मी पाहिली. मजूर चालतच निघाले व लाखो मजूर बिहार, उत्तर प्रदेशच्या सीमेवर जाऊन रखडले. त्यांना तेथे घोटभर पाणीही मिळत नव्हते. सोनू सूद त्या भुकेल्यांच्या खवळलेल्या गर्दीत पोहोचले नाहीत. हे लाखो लोक तेथे पोहोचले ते काय फक्त सोनू सूदने खास व्यवस्था केलेल्या बस, रेल्वेने? ते आपले कुटुंबाचे ओझे वाहत चालतच निघाले. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था जशी महाराष्ट्र सरकारने केली तशी इतरत्र झाल्याचे दिसत नाही. केंद्र सरकारने तर या मजुरांना वाऱ्यावर सोडले. मजुरांना आपापल्या गावी जाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारने एक खास कक्ष उभा केला, पण ‘‘कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरसह एक मेसेज करा. सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल,’’ असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काही करत नाही, पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला, असं संजय राऊतांनी म्हटलं.सोनू सूद या महात्म्याचे नाव आता पंतप्रधान मोदींच्या एखाद्या ‘मन की बात’मध्ये येईल. मग ते दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीस निघतील व एक दिवस ते भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फिरताना दिसतील. तसा करार आधीच झाला असेल म्हणून सोनू सूद लॉक डाऊनचा मालामाल हीरो म्हणून तळपत राहिला. इतर सर्व हिरो लॉक डाऊन काळात घरीच बसले तेव्हा सोनू सूदचा अभिनय बहरून निघाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले. सोनू सूद हा एक उत्तम अभिनेता आहेच. सोनू सूद पडद्यावर आणि रस्त्यावरही उत्तम अभिनय करतो. कारण पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक तितकेच कसलेले होते.सोनू सूद यांचा पुढील राजकीय चित्रपट कोणता? त्याचा खुलासा लवकरच होईल, असंही शेवटी संजय राऊतांनी सांगितलं.

Protected Content