ट्रक घेवून फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव  प्रतिनिधी । उसनवारीने घेतलेले २० हजार रुपये फेडण्यासाठी सहा लाख रुपयांचा ट्रक घेतला. नंतर हे पैसे फेडल्यावर ट्रक परत करण्याऐवजी गायब केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

दिपक उर्फ भैय्या अरूण पाटील (रा. आकुलखेडा ता. चोपडा) आणि मुकेश शांताराम चौधरी (रा. धरणगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास सोनू चव्हाण (वय ४०,रा.देव्हारी, ता.जळगाव) या तरुणाने २०१९ मध्ये सहा लाख रुपयांचा ट्रक (क्र.एम.एच.१८ ए.ए.१७४९) फायनान्स कंपनीकडून घेतला. गुरांच्या बाजार येथे ट्रकचा वापर करुन भाडे करीत असताना दुसऱ्या ट्रकचा चालक नीलेश परदेशी या तरुणाशी कैलास याची ओळख झाली. पैशाची गरज भासल्याने ओळखीमुळे कैलास याने नीलेशकडून २० हजार रुपये उसनवारीने घेतले. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये एमआयडीसीत नीलेश याने कैलासकडे घेतलेले २० हजार रुपये परत मागितले. लॉकडाऊन असल्याने अडचण आहे, नंतर करुन देईल, असे कैलास याने सांगितले असता मलाही सध्या काम नाही. दोन महिन्यासाठी तुझा ट्रक मला दे, मी त्यावर भाडे करतो. त्यात तु घेतलेले २० हजार रुपये कमवून घेतो व तुला तुझा ट्रक परत करतो असे सांगून ट्रक घेऊन गेला. त्यादिवसापासून नीलेशचा संपर्कच बंद झाला. कैलास याने त्याच्या गावाला जावून शोध घेतला असता तो तेथेही नव्हता. अशातच ७ जुलै रोजी कैलास दुसऱ्या ट्रकमध्ये माल भरुन नागपूर येथे गेला असता नीलेश तेथे एका ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात भेटला. ट्रकबाबत विचारणा केली असता जळगावात असल्याचे सांगितले. त्यानुसार कैलास जळगावात आल्यावर त्याच्याकडे विचारणा केली तर चोपड्यात असल्याचे सांगितले. तेथे गेल्यावरही ट्रक गायब झालेला होता. नीलेश याने ट्रकची विल्हेवाट लावल्याची खात्री पटल्यानंतर कैलास याने मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

या गुन्ह्यातील पहिला संशयित आरोपी निलेश राजेंद्र परदेशी (वय-२३) रा. मामलदा ता.चोपडा याला १४ जुलै रोजी जळगावातील ट्रान्सपोर्ट नगरातून अटक केली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप‍ शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहय्याक फैजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, योगेश बारी, सचिन पाटील कारवाई करत फरार असलेले दोन्ही संशयित आरोपी दिपक उर्फ भैय्या अरूण पाटील (रा. आकुलखेडा ता. चोपडा) आणि मुकेश शांताराम चौधरी (रा. धरणगाव) यांना काल गुरूवारी १५ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. आज शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्या.ए.एस.शेख यांनी त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड.प्रिया मेढे यांनी बाजू मांडली.

Protected Content