जळगाव , प्रतिनिधी । कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ सप्टेंबर पासून ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील ५० वयापेक्षा जास्त वयोमान असलेल्या नागरिकांचे आरोग्य सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य पथकांना कुटूंबातील सदस्यांची माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिषेक राऊत यांनी केले आहे.
‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अभियानांची पूर्वतयारी म्हणून १२ ते १५ सप्टेंबर २०२० या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींचे सखोल आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वक्षणासहित ग्रामीण भागात गाव पातळीवर व नागरी भागात प्रभाग पातळीवर सर्वक्षण पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. यात शासनाचे विविध विभागाचे कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे सदस्य यांचा समावेश आहे. नियुक्त पथके घरो घरी भेट देऊन ५० पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहेत.
कोरोनाचे निदान लवकर झाले तर रुग्ण औषधांपचाराने बारा होतो. जिल्ह्यात अद्यापपर्यंत २५ हजार ८४६ रुग्ण कोरोनातून बरे झालेले आहेत. परंतु , लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास रोग बळावतो व रुग्ण गंभीर अवस्थेस जावून रुग्ण दगावण्याची शक्यता असते. जिल्हाधिकारी अभिषेक राऊत यांनी आवाहन केले आहे की, आपल्या घरी भेट देण्याऱ्या पथकांना सहकार्य करून त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांची परिपूर्ण माहिती द्यावी व आपल्या कुटुंबाचा कोरोना या साथरोगापासून बबचाव करावा.
दरम्यान, या संदर्भात आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सामाजिक संस्थांची बैठक सोमवारी महापालिका सभागृहात दुपारी १२ वाजता आयोजित केली आहे. या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.