पाचोरा, प्रतिनिधी | अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी या नैराश्येतून तालुक्यातील जामने येथील तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील जामने येथील युवा शेतकरी राहुल राजेंद्र पाटील (वय – २६) हा शेतात गेलेला असताना शेडच्या लोखंडी रॉडला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आमहत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तत्पूर्वी राहुल राजेंद्र पाटील यांनी वडीलांकडून पाच एकर जमीन कसण्यासाठी घेतली होती. त्यात त्यांनी कापसाची लागवड केली. मात्र झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक वाया गेला. त्यात शेती कसण्यासाठी झालेला खर्च खर्चही निघणार नाही. व कर्जफेड कशी करावी या नैराश्येतून त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली. दरम्यान राहुल याचे शवविच्छेदन करण्यात आले असून वैद्यकीय अधीक्षक यांच्या खबरीवरून पिंपळगाव हरे पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि कृष्णा भोये यांच्या निर्देशानुसार स फौ विजय माळी हे करीत असून मयताच्या पाश्चात्य वृध्द आई- वडील, एक भाऊ, एक बहीण, पत्नी व अडीच वर्षाची एक मुलगी असा परिवार आहे.