जळगाव शहरात तीन दिवस जनता कर्फ्यु ; सहकार्यासाठी प्रशासनाचे आवाहन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोनाची संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी जळगाव महानगरपालिका क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु लागू करण्यात आला असून नागरिकांनी त्यांचे स्वयंस्फुर्तीने पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

श्री.राऊत म्हणाले, गुरुवार 11 मार्च रात्री 8 वाजेपासून 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यु राहील. या कालावधीत शहरातील बाजारपेठा बंद राहतील. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. तसेच समाजसेवी संस्था, व्यापारी संस्था आणि लोकप्रतिनिधीनीदेखील याबाबतची मागणी केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा किंवा इतर शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित परीक्षा पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार होतील. परीक्षार्थींना अडचण होणार नाही. याबाबतची दक्षता घेण्यात येईल. सोमवारी सर्व दुकाने उघडण्यात येणार असून नागरीकांनी पुढील दोन दिवस गर्दी करु नये, तसेच वस्तुंचा साठा करु नये.

लसीकरण कार्यक्रम नियोजनानुसार सुरु राहील. सर्व निर्बंध जळगाव महानगरपालिका क्षेत्रासाठी असून  आवश्यकतेनुसार तालुकास्तरावर त्यांची अंमलबजावणी नंतर करण्यात येईल. राज्यातील इतर भागातून होणारी प्रवासी वाहतूक सुरु राहील. टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनाची सेवा केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेकरीता तसेच शासकीय, औद्योगिक आस्थापना कर्मचारी याचे वाहने आणि परीक्षार्थीं विद्यार्थ्यांसाठी राहील. हॉस्पिटल, ओपीडी व रुग्णवाहिका सेवा सुरु राहतील. सर्व प्रकारची रुग्णालये, औषधांची दुकाने सुरु राहतील. दुध खेरदी-विक्री केंद्रे, कृर्षी, आणि औद्योगिक आस्थापना सुरु राहतील. शासकीय कार्यालये 50 टक्के उपस्थितीने सुरु राहतील.

पेट्रोल पंप केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनासाठी सुरु राहतील. रेल्वे,‍ विमानसेवा, मालवाहतुक सुरु राहील. तसेच कुरीयर,गॅरेज, वर्कशॉप, वृत्तपत्र, मिडीया सेवा,बँका व वित्तीय संस्था, पोस्टल सेवा,पशुखाद्य केंद्रे, पशुवैद्यकीय सेवा सुरु राहतील.

शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खाजगी क्लासेस, बाजारपेठेतील दुकाने बंद राहतील.सर्व प्रकारचे हॉटेल बंद राहतील, मात्र पार्सल सेवा सुरु राहील. किरकोळ भाजीपाला आणि फळ विक्री, धार्मिक स्थळे, सभा, मेळावे, बैठका, शासकीय ,खाजगी बांधकामे (मान्सून पूर्व कामे वगळून ) शॉपीग मॉल, मार्केट, किराणा दुकाने तसेच सर्व दुकाने, लिकर शॉप तसेच शॅाप, स्पा, सलून, खाजगी कार्यालये, गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, नाट्यगृहे, क्रिडा स्पर्धा, पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे, प्रदर्शने, मेळावे, संमेलन,आठवडी बाजार, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहील असे त्यांनी सांगितले.

ज्या विशिष्ट प्रवर्गाना जनता कर्फ्यु मधुन सुट देण्यात आलेली आहे. त्यांनी आपले सोबत कार्यालयाचे, आस्थापनाचे, शाळा, महाविद्यालयाचे ओळखपत्र तसेच 14 मार्च रोजी होणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिक्षेचे हॉल तिकिट सोबत बाळगणे अनिवार्य राहील असेही जिल्हाधिकारी म्हणाले. डॉ. मुढे म्हणाले जनता कर्फ्यु दरम्यान नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. कोरोनाची संपर्क साखळी थांबविण्यासाठी नागरिकांनी मार्गदर्शक सुचनाचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

https://www.facebook.com/508992935887325/videos/836851023890669

 

Protected Content