जळगाव । जनसंग्राम ठेवीदार संघटनेचे पदाधिकारी व ठेवीदार सविनय कायदेभंग करून जेलभरो आंदोलन करणार आहेत.
जनसंग्राम बहुजन लोकमंच प्रणित महाराष्ट्र राज्य ठेवीदार समितीची बैठक आज गुरुवार 17 रोजी संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली येथील प्रशासकीय इमारतीच्या आवारात घेण्यात आली. बैठकीत सहकार विभाग ठेवीदारांच्या प्रश्नी गंभीर नसल्याने उपस्थित वयोवृद्ध ठेवीदारांनी तीव्र संताप केला.
जळगाव जिल्ह्यातील ठेवींचा प्रश्न 2007 पासून जैसे थे आहे.2016 मधील मंत्रिमंडळ विस्तारात सत्ताधारी सरकारमध्ये सहकार राज्यमंत्री म्हणून गुलाबराव पाटलांची वर्णी लागल्यानंतर जिल्ह्यातील ठेवीदारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानंतर ठेवीदारांच्या आमरण उपोषणाची दखल घेऊन तत्कालीन आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी जळगावात विशेष बैठक घेऊन वर्षभराचा कृती कार्यक्रम जाहीर करून सुद्धा त्याची कोणतीच अंमलबजावणी झाली नाही. राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यावेळी सहा महिन्यात ठेवी न मिळाण्याचे दिलेले आश्वासन सुद्धा पोकळ ठरले. जिल्ह्यातच सहकार राज्यमंत्री एवढे मोठे पद असून सुद्धा तीन-साडेतीन वर्षाच्या कालखंडात ठेवींच्या प्रश्नी कृती शून्य राहिल्याच्या निराशाजनक भावना बैठकीत मांडल्या.
सहकार खात्याने ठेवींच्या प्रश्नी ठोस व शीघ्र उपाययोजना राबवाव्यात यासाठी मंगळवार,22 रोजी दुपारी 12 वाजता डीडीआर कार्यालयात सविनय कायदेभंग करून जेलभरो आंदोलन करतील.यात ठेवीदारांनी आता सर्व पर्याय संपले असल्याने स्वतःला अटक करण्याचा व जामीन न घेता तुरुंगातच राहण्याचा संकल्प बैठकीत केला.
आंदोलनाबाबत अवगत करणारे लेखी ईशारा निवेदन सहकार राज्यमंत्री,सहकार आयुक्त,जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आले. आंदोलनात जास्तीत जास्त ठेवीदारांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी समन्वयक डी.टी.नेटके,भास्कर चौधरी व यशवंत गाजरे यांनी केले.
बैठकीला महेश चोपडे,किरण राणे, सौ.नंदिनी फालक, यशवंत नेहते,सिंधू भिरुड,पांडुरंग अंबोरे,मधुकर जगताप, विजया खडके, शिवराम चौधरी,अशोक साळुंखे, निता भिरुड,वसंत गाजरे, बाबुराव चौधरी, देविदास फिरले,गोपाळ वाणी,अनिता राणे,भारती चौधरी,विनायक तळेले,कृष्णा पाटील,राजाराम नेमाडे, यादव फालक, विलास बेंडाळे, कल्पना कोल्हे,शोभा पाटील,प्रभाकर पाटील,रवींद्र रोटे,सुशीला होले,भास्कर चौधरी,प्रमिला भंगाळे, पद्माबाई बोरसे,लता धनगर, पंडित नेमाडे, वसुंधरा पाटील, प्रभाकर सरोदे,डिगंबर भारंबे, गंगाधर चौधरी, अरविंद बाऊस्कर, प्रल्हाद नेहते,कमल पाटील,लीला चौधरी आदी ठेवीदार उपस्थित होते.