चौकशा लावून विरोधी नेत्याचं तोंड बंद करता येणार नाही

उस्मानाबादः वृत्तसंस्था । जलयुक्त शिवार योजनेच्या कामांवर कॅगने ओढलेले ताशेरे आणि ठाकरे सरकारने घेतलेला चौकशीचा निर्णयावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘चौकशा लावून विरोधी पक्षनेत्याचं तोंड बंद करता येईल असं वाटत असेल तर ते होणार नाही,’ अशी टीका केली आहे.

उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘जलयुक्त शिवाराची जी काही चौकशी करायची ती जरुर करावी. कोणतेच काम मंत्रालयातून मंजूर झालेलं नाही. स्थानिक स्तरावर कामांच्या मंजुरीचे अधिकार होते ६ लाखांवर कामे झाली आहेत. जिल्हाधिकारी प्रमुख होते स्थानिक पातळीवर यांचे टेंडर निघाले आहेत. एका लाखापासून ते पाच लाखांपर्यंतची ही कामं आहेत,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘७०० तक्रारी प्राप्त झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सहा लाख कामांमध्ये ७०० तक्रारी अर्धा टक्कादेखील नाहीत. सरकारी कामात एक टक्काही तक्रार येऊ नये, पण त्यात किमान पाच ते सात टक्के किमान असतात. जाणीवपूर्वक चौकशी लावण्यात आली आहे. अशा चौकशी लावून विरोधी पक्षनेत्याचं तोंड बंद करता येईल असं वाटत असेल तर तसं होणार नाही. विरोधी पक्षनेता जनतेचा असतो, तो जनते करताच काम करणार आहे,’ कोरोना संपल्यानंतर आम्ही जलयुक्त शिवारामुळं किती फायदा झाला याचं प्रदर्शन मांडणार आहोत,’ असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

Protected Content