चीनच्या कथनी आणि करणीतील फरकच त्रासदायक

नवी दिल्ली वृत्तसंस्था   चीनच्या बोलण्यात आणि करण्यात खूप फरक असतो, हे वारंवार सिद्ध झालंय. पूर्व लडाखमध्ये संघर्ष निर्माण झालेल्या ठिकाणांहून दोन्ही देशाच्या सैन्यांनी माघार घ्यावी, अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली होती. पण प्रत्यक्षात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची कृती बिलकुल याउलट आहे. ग्राऊंड लेव्हलवर चिनी सैन्याने मागे हटण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

पँगाँग टीएसओमध्ये फिंगर फोरजवळ चीन उलट सैन्य तैनाती आणखी मजबूत करत आहे. पँगाँग सरोवरच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर फोर येथे चीनने आपली पकड मजबूत करण्यासाठी सैनिक संख्या दुप्पट केली आहे. त्यामुळे चीनच्या हेतूबद्दलच शंका आहे. पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावर भारतही मजबूत स्थितीमध्ये आहे. तिथल्या टेकडया भारतीय सैन्याने ताब्यात घेतल्या आहेत.
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर आज मॉस्कोमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची भेट घेणार आहेत. सीमेवर असलेली युद्धजन्य स्थिती लक्षात घेता, ही भेट खूप महत्त्वाची आहे. १९९३ साली दोन्ही देशांमध्ये सीमेवर शांतता ठेवण्यासाठी करार झाला होता. त्याची आठवण जयशंकर आज चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना करुन देतील.

पूर्व लडाखमध्ये चीनच्या कुरापती सुरूच आहेत. रेझांग-ला येथील मुखपरीजवळ भाले, लोखंडी शिगा आणि अन्य शस्त्रे हाती घेतलेल्या चिनी सैन्याने सोमवारी भारतीय जवानांना चिथावणी दिली. चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ गोळीबारही केला. भारताचा भूभाग बळकावण्याचा चीनचा प्रयत्न भारतीय जवानांनी पुन्हा हाणून पाडला असून, चीनच्या खुमखुमीमुळे प्रत्यक्ष ताबारेषेवरील स्थिती स्फोटक बनली आहे.

Protected Content