गडबड, गोंधळ सीमेवर नसून दिल्लीतच, मोदींचे म्हणणे पटले : शिवसेना

मुंबई (वृत्तसंस्था) गडबड, गोंधळ सीमेवर नसून दिल्लीतच, मोदींचे म्हणणे पटले : शिवसेना परराष्ट्र व संरक्षणविषयक चुकलेल्या धोरणाचे हे फलित असून, चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली. चीनने आपले २० सैनिक मारले. त्याचा बदला मोदी सरकार कसा घेणार, हाच खरा सवाल आहे. गडबड, गोंधळ सीमेवर नसून दिल्लीतच आहे, असे फार पूर्वी मोदी म्हणाले होते, ते आता पटले, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली आहे.

 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनात लिहिलेल्या लेखातून गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. गलवान व्हॅलीत चीनचे सैन्य घुसले व आज गलवान व्हॅली चिनी सैनिकांच्या कब्जात आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी दुपारी अधिकृतपणे जाहीर केले की, ‘गलवान व्हॅली हा चीनचाच भूभाग आहे.’ यावर हिंदुस्थानकडून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. २० जवानांच्या हत्येचा बदला मोदी सरकारने घेतला नाही तर ती आपली सगळ्यात मोठी मानहानी ठरेल. १९६२चे चीनबरोबरचे युद्ध नेहरूंच्या धोरणांमुळे हरलो हा डंका भाजपला आता पिटता येणार नाही. मोदी सरकारने तटस्थतेचे धोरण सोडून अमेरिकेच्या जास्त कच्छपी लागण्याचे धोरण स्वीकारले व सीमेवरचा चीन जास्त आक्रमक झाला हे येथे लक्षात घेतले पाहिजे. हिंदुस्थानच्या सीमेवरील बहुतेक सर्व राष्ट्रे आज चीनची मांडलिक आहेत. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका ही राष्ट्रे चीनच्या मदतीवर जिवंत आहेत व चीनच्या इशाऱयावर हिंदुस्थानला आव्हान देत आहेत. महासत्ता अमेरिकेशी मैत्री वगैरे ठीक, पण सीमा अशांत राहिल्या तर महासत्ता काय करणार? अमेरिकेसाठी निकटचा शेजारी असलेल्या चीनशी भांडण करणे ही परराष्ट्र व संरक्षणविषयक नीती असू शकत नाही. दुर्दैवाने आज तेच घडताना दिसत आहे”, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

वीस सैनिक चीनबरोबरच्या झटापटीत हुतात्मा झाले. अनेक सैनिक बेपत्ता आहेत. ते याच झटापटीत खोल गलवान व्हॅलीत कोसळून मरण पावल्याची भीती आहे. आपला एकही सैनिक चीनचा बंदी नाही असे आधी सांगण्यात आले. प्रत्यक्षात आपले १० सैनिक चीनचे बंदी झाले होते. त्यांना नंतर चीनने सोडून दिले. हे चीनचे आक्रमण आहे व सरकार त्या आक्रमणाचा प्रतिकार करू शकले नाही. सरकारने या प्रकरणातल्या अनेक गोष्टी लपवून ठेवल्या, त्या आता उघड होत आहेत. पाकिस्तानचे सैन्य कारगिलपर्यंत पोहोचले हे समजताच पंतप्रधान वाजपेयींनी युद्धच पुकारले. लडाख, गलवान व्हॅली चीनच्या जबड्यात गेली व आपण सुटकेचा मार्ग शोधत आहोत. आता ट्रम्पही निवडणूक हरतील अशी स्थिती आहे. ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केले?. चीनशी आपले भांडण न संपणारे आहे; कारण या भांडणाचा सरळ संबंध आपण अमेरिकेशी ठेवलेल्या संबंधांशी आहे. आम्हाला आमच्या सीमारेषाच माहीत नाहीत व त्या सीमांच्या रक्षणासाठी देश बलिदान देत आहे. गलवान व्हॅलीत चिनी सैन्य आले. आपल्या सैन्याने प्रतिकार केला. चीन म्हणते, हा सर्व भाग आमचाच. उलट तुम्हीच घुसखोरी केली. यावर आम्ही तसे चूप बसलो आहोत, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Protected Content