खडसेंना बाजूला करण्यामागे दिल्लीतील नेतृत्वाचा हात ; पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक दावा

पुणे (वृत्तसंस्था) आपल्या नेतृत्वाला अडचण होईल म्हणून एकनाथराव खडसे नसलेले बरे, हा प्लान दिल्लीत झाला आहे. राज्यातील भाजप नेतृत्वात ही ताकद नाही. भाजपच्या दिल्ली नेतृत्वाचा वरदहस्त असल्याशिवाय असे होणे शक्य नाही, असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

 

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ऑनलाइन वार्तालाप कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनी खडसे यांना टार्गेट करण्यामागे भाजपच्या दिल्ली नेतृत्वाचा हात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. यावेळी चव्हाण म्हणाले की, ‘ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे प्रभावी लोकनेता आणि पर्यायी नेतृत्व असल्यानेच खडसेंना लक्ष्य करण्यात आले. भाजपच्या दिल्ली नेतृत्वाचा वरदहस्त असल्याशिवाय महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वामध्ये असे करण्याची ताकद नाही. राज्यात भाजपला उभे करण्याचे काम एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या लोकनेत्यांनी केले आहे. खडसे यांच्या सारखा लोकनेता काँग्रेसमध्ये आला तर त्याचा पक्षासाठी फायदाच होईल. असा प्रभावी नेता, पर्यायी नेतृत्व म्हणूनच त्यांना लक्ष्य करण्यात आले. पाच वर्षे मंत्रीपदासाठी झुलवत ठेवण्यात आले. आपल्या नेतृत्वाला अडचण होईल म्हणून खडसे नसलेले बरे, हा प्लान दिल्लीत झाला असल्याचे पुन्हा एकदा श्री. चव्हाण म्हणाले.

Protected Content