कोरोना ; आठवडाभरात देशात ३१ व महाराष्ट्रात ८१ टक्के रुग्णवाढ

 

 

 नवी  दिल्ली : वृत्तसंस्था ।  मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या ८१ टक्क्यांनी वाढली आहे  गेल्या आठवड्यामध्ये देशातील बाधितांच्या संख्येत तब्बल ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

 

भारतामध्ये २४ तासांमध्ये  १४ हजार १९९ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णसंख्येसोबतच भारतामधील बाधितांचा एकूण आकडा एक कोटी १० लाखांच्या वर गेलाय. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली असून ही चिंतेची बाब आहे. दिवसोंदिवस बाधितांची आकडेवारी वाढत असून त्यामुळे  दुसरी लाट अली की काय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. दुसऱ्या लाटेसंदर्भात सरकारी यंत्रणा आणि तज्ज्ञांनी स्पष्टपणे कोणतीही थेट भूमिका स्पष्ट केली नसली तरी सध्या सुरु असणारी रुग्णवाढ ही नोव्हेंबरनंतरची सर्वात मोठी वाढ आहे. सर्वात जास्त रुग्णांची वाढ ही महाराष्ट्रात झालीय.

 

रविवारी  देशभरामध्ये ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. मरण पावणाऱ्यांची संख्या एक लाख ५६ हजार ३८५ वर गेली आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांची टक्केवारी ९७.२२ पर्यंत गेलीय. म्हणजेच कोरोनावर आतापर्यंत एक कोटी सहा लाख ९९ हजार ४१० जणांनी मात केलीय. असं असलं तरी नवी आकडेवारी भारतीयांच्या चिंतेत भर घालणारी आहे. मागील पाच आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच सात दिवसांचा विचार केल्यास देशातील बाधितांच्या संख्येत एक लाख रुग्णांची भर पडली आहे. फेब्रुवारी २१ रोजी संपलेल्या आठवड्यात भारतामध्ये  एक लाख ९९० हजार रुग्ण आढळले. या पूर्वीच्या आठवड्यामध्ये नव्या रुग्णांची संख्या ७७ हजार २८४ इतकी होती.

 

 

 

महाराष्ट्रामध्ये मागील २४ तासांमध्ये सहा हजार ९७१ रुग्ण आढळून आले असून ३५ जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. मागील १२१ दिवसांमधील हा सर्वाधिक आकडा आहे. पुण्यामध्ये रविवारी  एक हजार १७६ नवे रुग्ण आढळून आले. तर सहा जणांनी पुणे जिल्ह्यात रविवारी प्राण गमावला. जिल्हा प्रशासनाने  संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आदेश दिले आहेत.. २१ फेब्रुवारी रोजी जो आठवडा संपला त्यामध्ये महाराष्ट्रात ३६ हजार ६०६ रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व सार्वजनिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याची घोषणा रविवारी केली. पुढील आठ दिवसांमध्ये राज्यातील रुग्णसंख्या कशी वाढते किंवा कमी होते त्यानुसार लॉकडाउनसंदर्भातील निर्णय़ घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. लॉकडाउन हा पर्याय नसला तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

 

 

 

केरळमध्येही प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आलं होतं. मात्र तेथील परिस्थिती आता सुधरत आहे. मागील २४ तासांमध्ये केरळमध्ये चार हजार ७०  नवे रुग्ण आढळून आलेत. शनिवारच्या तुलनेत हा आकडा ५०० ने कमी आहे. आठवड्यांचा विचार केल्यास केरळमध्ये मागील आठवड्यात ३० हजार ८७१ बाधित आढळून आले. ही सप्टेंबरनंतरची सात दिवसात झालेली सर्वात कमी वाढ आहे.

 

जागतिक स्तरावर अमेरिकेमध्ये करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या पाच लाखांच्या जवळ जाताना दिसत आहे. जगातील सर्वाधिक  मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेमध्ये  लसीकरण मोहीम संपूर्ण ताकदीनिशी सुरु करण्यात आली असली तरी परिस्थिती सामान्य होण्यासाठी आणखीन बराच काळ जाईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

 

Protected Content