कोरोनापासून तुमचा जीव तुम्हीच वाचवा ; मोदी मोरांसोबत व्यस्त

 

नवी दिल्ली ,  वृत्तसंस्था ।राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. पावसाळी अधिवेशनात सरकारवर दबाव टाकण्यासाठी काँग्रेसकडून आक्रमक प्रयत्न केला जाणार, याची झलकच राहुल गांधींनी दाखवून दिलीय. ‘मोदी सरकारनं म्हटलंय आत्मनिर्भर बना म्हणजेच तुमचा जीव तुम्ही स्वत:च वाचवा कारण पंतप्रधान मोरांसोबत व्यग्र आहेत’ असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केलीय.

कोरोना संक्रमणाचे आकडे या आठवड्यात ५० लाख आणि सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १० लाखांच्या पार गेलेली असेल. अनियोजित लॉकडाऊन एका व्यक्तीच्या अहंकाराचा परिणाम आहे ज्यामुळे कोरोना देशभरात फैलावला गेला, असं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

कोरोना संकटकाळा दरम्यान संसदेत आजपासून १८ दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय. यावेळी संदेत चीनची घुसखोरी, देशासमोरील आर्थिक आव्हानं यासंबंदी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाणार असल्याचं दिसतंय. विरोधकांकडून सभागृहात अनेक विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळण्याची मागणी केली जातेय तर दुसरीकडे सरकारचा मात्र जवळपास दोन डझन विधेयके संमत करण्यावर भर आहे

राहुल गांधी संसद अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काही दिवसांत चर्चेत सहभागी होणार नाही. ते आपली आई सोनिया गांधी यांच्यासोबत परदेशात आहेत. सोनिया आपल्या वार्षिक मेडीकल चेकअपसाठी परदेशी रवाना झाल्या आहेत. आईची काळजी घेण्यासाठी राहुल गांधीही त्यांच्यासोबत आहेत. ७३ वर्षीय सोनिया गांधी यांना जवळपास दोन आठवडे परदेशात राहावं लागू शकतं. त्यामुळे संसद अधिवेशनाच्या जवळपास ५० टक्के चर्चेत त्या सहभागी होऊ शकत नाहीत. राहुल मात्र एक-दोन दिवसांत मायदेशात परणार असल्याचं समजतंय. परदेशी रवाना होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी शुक्रवारी संरक्षण संबंधी संसदीय समितीच्या बैठकीत सहभाग घेतला.

सोनिया गांधी यांच्यासोबत राहण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा या सोनियांजवळ पोहचताच राहुल गांधी भारतात परणार असल्याचं समजतंय. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीबद्दल पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना अगोदरच माहिती देण्यात आलीय.

Protected Content