कोरोनाची तिसरी लाट रोखण्याचा मार्ग

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी कोरोनाची तिसरी लाट आपण कशी रोखू शकतो, याविषयी मार्गदर्शन करणारी भूमिका मांडली आहे. आज राघवन यांनी ही भूमिका मांडल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांसाठी महत्त्वाची बाब ठरली आहे.

 

 

देशभरात दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसला  आहे. नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असताना मृतांचा आकडा देखील नियंत्रणात आणण्यात   अपयश आलेलं आहे.  केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी  देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचं विधान केलं होतं. त्यामुळे चिंता अधिकच वाढली होती.

 

के. राघवन यांनी देशातील सर्व आरोग्य यंत्रणांसोबतच प्रशासकीय व्यवस्थापनाला देखील यावेळी सूचनावजा इशाराच दिला आहे. “आपण कठोर पावलं उचलली, तर तिसरी लाट कदाचित कुठेच येणार नाही. आपण स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि शहर पातळीवर नियम किंवा मार्गदर्शक सूचना किती प्रभावीपणे अंमलात आणतो, यावर हे अवलंबून असेल”, असं ते म्हणाले.  कठोर पावलं उचलणं आवश्यक असल्याचं सांगतानाच या नियमांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणं देखील आवश्यक असल्याचं त्यांनी  सांगितलं.

 

देशात गेल्या २४ तासांत ४ लाख १४ हजार १८८ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ वर पोहोचली आहे.

तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्यानंतर या मुद्द्यावरून न्यायालयानं केंद्र सरकारची आणि दिल्ली सरकारची कानउघाडणी केली आहे.

Protected Content