कोणत्याही हिंदू राजाने कोणाचेही जबरदस्तीने धर्मांतर केले नाही : गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आम्ही मुस्लिम किंवा मुस्लिम संस्कृतीच्या विरोधात नाही. सर्वजण काफिर आहेत या प्रवृत्तीच्या आम्ही विरोधात आहोत. पाच हजार वर्षांच्या इतिहासात कोणत्याही हिंदू राजाने कोणाचेही जबरदस्तीने धर्मांतर केले नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते.

 

दिल्लीत अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी नितीन गडकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गडकरी म्हणाले की, पाच हजार वर्षांच्या इतिहासात कधीही कोणत्याही हिंदू राजाने एकही मशीद उद्धवस्त केली नाही. तसेच त्यांनी तलवारीच्या जोरावर कोणाचेही जबरदस्तीने धर्मांतर केले नाही. हिंदू संस्कृती प्रगतीशील, सर्वसमावेशक आणि सहिष्णू असल्याचेही गडकरी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना कडक शिकवण दिली होती की, कोणत्याही धर्माच्या पवित्र स्थळाचा अपमान होता कामा नये. कोणत्याही धर्माच्या माहिला असतील त्यांच्याशी आईसारखा व्यवहार करायला हवा. त्याचबरोबर सावरकरांनी जी राष्ट्रवादी विचारांची शिकवण दिली ती आपल्यासाठी खूपच गरजेची आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

Protected Content