कोकण , मुंबई , विदर्भ वगळता उर्वरित राज्याला पावसाची प्रतीक्षाच

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  पुढील पाच दिवस कोकणात काही ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्याच्या बहुतांशी भागात जोरदार पावसासाठी वाट पाहावी लागणार आहे.

 

राज्यात मान्सूनच्या जोरदार आगमनानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून याचा फटका अनेक गावांना बसला आहे. अशात आता मुंबईसह अन्य जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील २ दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात १८ आणि १९ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने  व्यक्त केली. गेल्या २४ तासांत रायगडमध्ये वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस झाला असून आणि किनारपट्टी परिसात दरवर्षी पडणाऱ्या पावसापैकी १७.३३ टक्के पाऊस काही दिवसांतच पडला आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने गुरुवारी दिली.

 

कोकण किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह कोकणात मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. रविवार, सोमवारी कडक ऊन पडल्यानंतर मंगळवारी मुंबईत हलक्या सरी कोसळल्या होत्या. बुधवारी सकाळपासूनच मुंबईतील विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस झाला.

 

३ जून रोजी मोसमी वारे केरळात दाखल झाले. त्यानंतर मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्रातून द्रुतगती प्रवास करत दोनच दिवसांत महाराष्ट्रात मजल मारली. मात्र, पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकूल वातावरणीय स्थिती नसल्याने मोसमी वाऱ्यांनी फारशी प्रगती केलेली नाही. सध्या सूरत, नंदूरबार, भोपाळ, बरेली, अमृतसरपर्यंतची मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीची सीमा कायम आहे.

 

महाराष्ट्रात मोसमी वारे पोहोचले असूनही शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कोकण, विदर्भात जोरदार हजेरी लावणाऱ्या मोसमी पावसाने पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात अनेक ठिकाणी समाधानकारक हजेरी लावलेली नाही.

Protected Content