कुंभमेळ्यात ४ लाख कोरोना चाचण्या बनावट

 

 डेहराडून : वृत्तसंस्था ।  उत्तराखंड आरोग्य विभागाने हरिद्धारमध्ये कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी चार लाख चाचणी अहवाल बनावट असल्याचा संशय व्यक्त केला होता. नंतर तपासात एकूण १ लाख चाचणी अहवाल बनावट असल्याचे स्पष्ट झाले

 

खासगी एनज्सीच्या सहाय्याने बनावट अहवाल तयार करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

 

 

एका प्रकरणात तर एकाच फोन क्रमांकावरुन ५० जणांचं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं असून एकच अँटिजन टेस्ट किट ७०० चाचण्यांसाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. “पत्ते आणि नावं काल्पनिक आहेत. हरिद्वारमधील ‘घर क्रमांक ५’ मधून ५३० नमुने घेण्यात आले आहेत. एकाच घऱात ५०० लोक राहत असणं शक्य तरी आहे का? काही जणांनी तर मनाप्रमाणे पत्ते टाकले आहेत. घर क्रमांक ५६, अलिगड; घर क्रमांक ७६, मुंबई असे पत्ते लिहिले आहेत,” अशी माहिती तपासात सहभागी एका अधिकाऱ्याने दिली आहे.

 

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “खोटे फोन नंबरही देण्यात आले आहेत. कानपूर, मुंबई, अहमदाबाद आणि १८ इतर ठिकाणच्या लोकांनी एकच फोन क्रमांक दिला आहे”.

 

कुंभमेळ्यातील आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्जून सिंह सेनगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “एजन्सीने दोन खासगी प्रयोगशाळांमधील नमुने जमा करणं अपेक्षित होतं. त्याचीही चौकशी सुरु आहे”. दरम्यान आरोग्य सचिव अमित नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हरिद्वारच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सविस्तर तपास अहवाल पाठवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी अनियमितता आढळली असून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी १५ दिवसांनी सविस्तर अहवाल पाठवल्यानंतर आम्ही कारवाई करु”.

 

हरिद्वारचे जिल्हा दंडाधिकारी सी रवीशंकर यांनी  पुढील नोटीस येईपर्यंत सर्व एजन्सींचं देय थांबण्यात आली असल्याचं सांगितलं आहे.

 

धक्कादायक म्हणजे एजन्सीकडून नमुने गोळा करण्यासाठी जबाबदारी देण्यात आलेले २०० जण राजस्थानमधील विद्यार्थी आणि डेटा ऑपरेटर असल्याचं समोर आलं आहे जे कधीही हरिद्वारमध्ये आले नव्हते. “नमुने गोळा करणारी व्यक्ती तिथे स्वत: उपस्थित असणं गरजेचं आहे. एजन्सीकडे नोंदणी असणाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यातील ५० टक्के राजस्थानचे रहिवासी असून विद्यार्थी आणि डेटा ऑपरेटर आहेत,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

 

उच्च न्यायालयाने उत्तराखंडला कुंभदरम्यान दिवसाला ५० हजार चाचण्या करण्याचा आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने एकूण आठ एजन्सींना नमुने गोळा करण्याची जबाबदारी दिली होती. हरिद्वारमध्ये १ ते ३० एप्रिलदरम्यान कुंभमेळा पार पडला. यावेळी नऊ एजन्सी आणि २२ खासगी प्रयोगशाळांनी मिळून एकूण चार लाख चाचण्या केल्या. यामध्ये अँटिजन टेस्ट सर्वाधिक होत्या. याशिवाय राज्य सरकारच्या वतीनेही सरकारी प्रयोगशाळेत चाचण्या करण्यात आल्या.

 

एजन्सीकडून करण्यात आलेल्या एक लाख चाचण्या सध्या वादात आहेत. यापैकी फक्त १७७ रिपोर्ट पॉझिटिव्ह होते, ज्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट ०.१८ टक्के होता. याउलट एप्रिल महिन्यात हरिद्वारमधील पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांवर पोहोचला होता.

 

एनज्सीला प्रत्येक अँटिजन टेस्टसाठी ३५० रुपये आणि आरटीपीसीआर टेस्टसाठी त्यापेक्षा जास्त पैसे दिले जात होते. याचा अर्थ हा करोडोंचा घोटाळा आहे. इतर एनज्सींकडून करण्यात आलेल्या चाचण्यांच्या अहवालाचीही तपासणी केली जात आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

 

Protected Content