काही शक्ती हुकूमशाही लादू पाहत आहेत

नगर: वृत्तसंस्था । सध्या काही शक्ती लोकशाही मोडून हुकूमशाही लादू पाहत आहेत. लोकशाहीच्या स्तंभांचे केंद्रीय सत्तेच्या मर्जीनुसार काम करणे चिंताजनक आहे. प्रशासन राज्यघटनेला बांधिल पाहिजे, मात्र ते सध्या सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने वागत आहे. अशाने जनतेच्या सर्वांवरील विश्वास उडेल,’ असा धोका कन्हैय्या कुमार याने व्यक्त केला.

संगमनेर येथील जयहिंद लोकचळवळीच्या वतीने ग्लोबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये लोकशाही या विषयावर कन्हैय्या कुमार म्हणाला, लोकशाही राज्य पद्धतीमुळे देशाची सर्वच क्षेत्रात प्रगती झाली ‘भारत विविध संस्कृती, जात, धर्म, वेष, भाषा असलेला देश आहे. ही विविधता समृद्ध करत एकात्मता वाढवण्यासाठी लोकशाहीने महत्त्वाचे काम केले आहे. मात्र सध्या देशातील लोकशाही संकटात असून ती वाचविण्यासाठी प्रत्येकाने देशहिताचे काम करावे असे,’ .

कन्हैया कुमार म्हणाला, ‘भारताला सत्य अहिंसेची मोठी परंपरा आहे. महात्मा गांधींनी या तत्त्वातून देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. प्रत्येकाला राज्यघटनेने समानतेचा अधिकार दिला. लोकशाही फक्त राजकीय क्षेत्रापुरती मर्यादित नसून प्रत्येक क्षेत्रात लोकशाही वाढली पाहिजे. गल्ली ते संसदेपर्यंत लोकशाहीची मूल्ये प्रत्येकाने जगली तरच पुढील काळामध्ये लोकशाही समृद्ध ठेवू शकतो. मात्र, हाथरससारख्या घटनांमध्ये लोकशाहीची सर्व मूल्ये पायदळी तुडवली गेली. गरिबांना व्यथा मांडता येत नाहीत. अशा परिस्थितीत विरोधकांनी आवाज उठवला पाहिजे. मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सत्ताधारी करत आहेत.’

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘जयहिंदच्या ग्लोबल कॉन्फरन्समुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरोगामी विचार व भारतीय संस्कृतीचे मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. राज्यघटनेवर विश्वास असणाऱ्या या पुरोगामी विचाराच्या चळवळीने सुसंस्कृत तरुण उभे केले. त्यांच्या माध्यमातून सदृढ समाज निर्मितीसाठी काम सुरू आहे. मात्र सध्या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून राजकारण केले जात आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.’

या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिसंवादात इंग्लंडमधून कार्लस टोर्नर, कायदे तज्ञ अॅड. असीम सरोदे, जर्मनीच्या मायकल क्राऊली, अमेरिकेतून जेरमी क्लेम, संगमनेरचे हिरालाल पगडाल यांनीही सहभाग घेतला.

Protected Content