कामगारांनी केंद्राच्या वीज कायदा २०२० ची प्रत जाळून नोंदविला निषेध

 

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे केंद्र सरकारच्या दडपशाही व मनमानी कारभार व धोरणास, तसेच वीज कायदा २०२० या विधेयकाला विरोधात आज देशव्यापी एक दिवसीय संपाचे आयोजन करण्यात आले होते. यानुसार जळगावातील वीज कामगारांनी जळगाव परिमंडळ कार्यालय समोर सकाळी १० ते ५ या वेळेत धरणे आंदोलन करत सुधारित कोड बिलाची प्रत जाळून केंद्र सरकारचा निषेध केला.

संघटनेचे व्यवस्थापन समिती सदस्य कॉ. जे. एन. बाविस्कर यांचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केंद्र सरकारच्या खाजगीकरण व निर्गुंतवणुक करण्याचे धोरणाचा खरपूस समाचार घेतला. संघटनेचे झोनल सचिव कॉ. विरेंद्रसिंग पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकार हे धनदांडगे व नफेखोरी करणारे व्यावसायिक व उद्योजक यांचे दावणीला बांधले असून त्यांच्या फायदा व स्वार्थासाठी धडाधड कायदे बदल करून शेतकरी, कष्टकरी, कामगार, सामान्य जनतेला देशोधडीला लावण्याचा एकमेव अजेंडा घेऊन काम करत आहे. वीज कायदा २०२० हे विधेयक मंजूर झाल्यास शासनाच्या मालकीच्या वीज उद्योगांचे खाजगीकरण व फ्रैंचाईजीकरण करून सार्वजनिक मालकी संपुष्टात येईल व वीज कामगार व कामगार चळवळ मोडीत काढण्याचा कुटील डाव आहे. तो मोडून काढण्यासाठी आज आपण प्रखर विरोध करीत असून भविष्यात हे आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला.

केंद्रीय महिला कार्यकारिणी सदस्या संध्या पाटील यांनी आपल्याला वीज उद्योग व रोजगार वाचविण्यासाठी प्रयत्नशील राहून आंदोलन च्या माध्यमातून प्राणपणाने संघर्ष करावा लागेल असं मत मांडले. पारेषणच्या विभागीय सचिव कॉ. वैशाली देवेंद्र पाटील यांनी केंद्र सरकार वीज कायदा २०२० च्या माध्यमातून खाजगीकरणं व फ्रैचाईझीकरण थोपवून उद्योग व चळवळ आणि आपली कुटुंबव्यवस्था उध्वस्त करण्याचं षडयंत्र थोपवत आहे असे मत मांडले. घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार सुरक्षेसाठी तयार केलेले एकुण ४४ कायदे रद्द करून फक्त ४ कामगार कायदे कोड बिल आणुन मालक व उद्योजक धार्जिणे धोरण राबविणेसाठी रूपांतर करत असून त्या सुधारीत कोड बिलाचीया प्रत याप्रसंगी जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

प्रमुख मागण्या….
विद्युत संशोधन बिल २०२० रद्द करणे , अस्तित्वात असलेल्या सर्व फ्रैंचाईझी रद्द करा .केंद्र शासित प्रदेशातील खाजगीकरण रद्द करा. तिन्ही पावर कंप न्यांचे केरळ स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड मर्या.व हिमाचल प्रदेश राज्य वीज मंडळ या प्रमाणे एकत्रीकरण करा. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागु करा. सक्तीच्या सेवानिवृत्ती योजनेच्या प्रावधान रद्द करा. सर्व कंत्राटी आऊटसोर्स कर्मचारी यांना तेलंगणा वीज उद्योग प्रमाणे कायम करा. फिक्स टर्म एन्क्पलायलायमेंट ही नवीन ठेकेदारी पध्दत रद्द करा. सर्व रिक्त पदांवर कायम कर्मचारी म्हणुन भरती राबवा अशा मागण्या होत्या.

आज आंदोलनात स्वयंस्फूर्तीने एसइएचे उपाध्यक्ष पराग चौधरी यांनी सुध्दा आम्ही या संघर्षात आपल्या सोबत आहोत अशी ग्वाही दिली. आजच्या धरणे आंदोलन यशस्वीतेसाठी सर्कल सचिव कॉ. प्रकाश कोळी, सर्कल अध्यक्ष कॉ.दिनेश बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. पारेषण सर्कल सचिव कॉ. अविनाश तायडे , कॉ.विलास तायडे , कॉ. गोकुळ सोनवणे, कॉ. सुनिल सोनवणे, सर्कल उपाध्यक्ष कॉ. जितेंद्र अस्वार, कॉ. सागरराज कांबळे , कॉ. प्रभाकर महाजन ,कॉ.मुकेश बारी , कॉ. भगवान सपकाळे माजी, रवि गायकवाड, धनंजय पाटील, विठ्ठल तायडे, संध्या चत्रे, शरद बारी, समाधान पाटील, चंदू कोळी, पवन पाताल, बन्सी, हेमंत बारी, प्रविण पाटील, दिनेश मोरे, संदीप पाटील, रमेश सुर्यवंशी , एफ. एम. मोरे, विनोद सपकाळ, अजय जमाले,सागर पाथरवट यांनी परिश्रम घेतले..

Protected Content