काँग्रेस व राष्ट्रवादीला फक्त मतांपुरतीच मराठ्यांची काळजी — चंद्रकांत पाटील

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । “१५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते,” अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसवर शरसंधान साधलं आहे.

 

 

राज्यात इतर प्रश्नांबरोबरच मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत बनू लागल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला धारेवर धरलं आहे.

 

 

मराठा आरक्षण याचिकांवर पुन्हा सुनावणी सुरू झाल्यानंतर राज्यात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर ट्विट करून निशाणा साधला आहे.

 

“तुम्हा प्रस्थापितांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचेच नव्हते. १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते. मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केलं. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने आजपर्यंत घेतली!,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.

 

 

पाटील आणखी एक ट्विट यासंदर्भात केलं आहे आहे. ज्यात “अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजपा सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला!,” असा आरोप केलेला आहे.

 

 

पाटील यांनी तिसऱ्या ट्विटमध्ये ठाकरे सरकारला सवाल केला आहे. “भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आणि ते न्यायालयात भक्कमरित्या टिकवलं सुद्धा पण या लबाड सरकारने मराठा समाजासाठी काय केलं ते सांगावं!  भाजपा सरकारने मराठा आरक्षणासाठी कायदा केला. राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन केलं. त्या आयोगाचा अहवाल आला, त्यात मराठा समाजासाठी आरक्षणाची शिफारस मिळाली. हा कायदा हायकोर्टात टिकवला. तो टिकण्यासारखाच भक्कम बनवला. पण तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं?,” असं पाटील यांनी महाविकास आघाडीला विचारलं आहे.

Protected Content