काँग्रेस खासदारावर शेतकरी आंदोलनात हल्ला

 

नवी दिल्ली । दिल्लीच्या सीमेवर सुरू असणार्‍या शेतकरी आंदोलनात काँग्रेसचे खासदार रणीवीतसिंह बिट्टू यांच्यावर हल्ला करण्यात आला असून त्यांची पगडी देखील खेचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसचे खासदार रणवीत सिंह जनसांसद कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला. यावेळी त्यांच्यासोबत अमृतसरचे खासदार गुरजीत सिंह आणि आमदार कुलबीर सिंह उपस्थित होते. रणवीत सिंह यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, तसंच त्यांची पगडीही खेचण्यात आली. आपल्यावरील हा हल्ला प्राणघातक असल्याचं रणवीत सिंह यांनी म्हटलं आहे.

रणवीत सिंह यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे. काही असामाजिक तत्वं ज्यांचा हेतू अस्पष्ट आहे त्यांनी आम्हा तिघांवर प्राणघातक हल्ला करुन परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला, असं रणवीत सिंह यांनी म्हटलं आहे. सिंह गाडीत बसल्यानंतरही काहीजणांनी काठ्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. दरम्यान रणवीत सिंह यांच्यावरील हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये आपण सध्या ठीक असल्याचं सांगितलं आहे. या हल्ल्यामागे शेतकरी असण्याचा प्रश्‍नच नाही, कोणीतरी जाणुबुजून हा हल्ला केल्याचा आरोप नेत्यांकडून करण्यात आला आहे.

Protected Content