कबीर कला मंचच्या दोन कार्यकर्त्यांना अटक

पुणे वृत्तसंस्था । पुण्यात ३१ डिसेंबर, २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषद संदर्भातील गुन्ह्यात एनआयएनं आणखी दोन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी पुण्यातील कबीर कला मंचचे कलाकार आहेत. दोघांचे माओवादी संघटनेशी संबध असल्याचा आरोप असून, एल्गार परिषद आयोजित करण्यात आलेल्या समितीचे सक्रिय सदस्य असल्याचं म्हटलं आहे. सागर गोरखे आणि रमेश गायचोर अशी त्यांची नावं आहेत.

पुण्यात २०१७ मध्ये शनिवार वाड्यावर एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर कोरेगाव भीमा येथे हिंसाचाराची घटना घडली. तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहेत. त्यावेळी काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज एनआयएनं आणखी दोघांना पुण्यात अटक केली आहे.

ज्या समितीनं एल्गार परिषद आयोजित केली होती, त्या भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान समितीचे हे दोघे त्यावेळी सक्रिय सदस्य होते. आणखी दोन दोघांना अटक केल्यामुळे अटक करण्यात आलेल्यांची संख्या १४ झाली आहे. अटक झालेले अनेकजण मानवी हक्क कार्यकर्ते, प्राध्यापक आणि वकील आहेत. जुलैमध्ये एनआयएनं दिल्ली विद्यापीठातील प्रा. हनी बाबू एम. टी यांना अटक केली होती.

मागील काही दिवसांपासून गोरखे आणि गायचोर यांना एनआयएकडून मुंबईला चौकशीसाठी बोलवलं जात होतं. अशी माहिती आरोपींचे वकील मिहीर देसाई यांनी दिली .
पुणे शहर पोलिसांनी देशभरातून २३ जणांना आरोपी केले होते. हे सर्व आरोपी प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. तसेच प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या ध्येय धोरणानुसार माओवाद्यांचे पैसे वापरून एल्गार परिषद आयोजित केल्याचाही आरोपही पोलिसांनी केला होता.

Protected Content