चाळीसगाव, प्रतिनिधी | कन्नड घाटातील काम अपूर्ण असतानाही अवजड वाहनांना परवानगी देण्यात आल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सतत वाहनांची कोंडी होत आहे. यामुळे वाहन धारकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात दरड कोसळली. तेव्हापासून कन्नड घाटात रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. दरम्यान रस्त्यांची दुरुस्ती होत असल्याने अवजड वाहनांसह हलक्या वाहनांवर प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. मात्र घाटातील काम अजून सुरू असून ते अपूर्ण आहे. तरीही अवजड वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. यामुळे कन्नड घाटात गेल्या दोन दिवसांपासून सतत वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली असून वाहन धारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यात रूग्णांना घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्स हे ट्रॅफिक मध्ये अडकून पडल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. किंबहुना त्यांच्या जीवाला अधिक धोका असल्याची प्रतिक्रिया ठिकठिकाणाहून उमटविले जात आहे. दरम्यान महामार्ग पोलिस रोडावर उतरून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.