मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून याचा राज्यातील हजारो कंत्राटी ग्रामसेवकांना लाभ होणार आहे.
राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांची उपस्थिती होती. यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात लक्षणीय बाब म्हणजे कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात आता वाढ करण्यात आली आहे. आधी ग्रामसेवकांना फक्त सहा हजार मासिक वेतन होते. यात तब्बल दहा हजार रूपयांची वाढ करण्यात आली असून यापुढे सोळा हजार रूपयांचे मासिक वेतन मिळणार आहे. याचा राज्यातील हजारो ग्रामसेवकांना लाभ होणार आहे.
दरम्यान, आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत खालील निर्णय घेण्यात आलेत.
● सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता
( मदत व पुनर्वसन विभाग)
* कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये
(ग्राम विकास)
● अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा.
(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)
● पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढविली.
(शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)
● लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार
(पशुसंवर्धन विभाग)
● पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार
(विधि व न्याय विभाग)
● अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ
(विधि व न्याय विभाग)