कंगनाला पाठिंबा ; महाराष्ट्रावर सूड उगवणाऱ्या भाजपच्या कटाचाच भाग

मुंबई: वृत्तसंस्था । ‘सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षानं वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेवर सूड उगवण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी कलाकारांचा अपमान करणाऱ्या कंगना राणावत हिला भाजपनं पाठिंबा देणं हा त्याचाच एक भाग आहे. त्याबद्दल भाजपनं महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे,’ अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

बॉलिवूडच्या बदनामीविरोधात आवाज उठविणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्यावर कंगना राणावत हिनं अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कंगनानं उर्मिला मातोंडकर हिच्याविषयी वापरलेल्या हीन भाषेचा काँग्रेसनं जोरदार निषेध केला आहे. ‘उर्मिला मातोंडकरनं महाराष्ट्राचं नाव देशात मोठं केलंय. अॅवॉर्ड विनिंग कामगिरी केलीय. मध्यमवर्गातील एक मराठी मुलगी नाव कमावते याचा आम्हाला अभिमान आहे. भाजपला तो नसेल. त्यांनी कंगनाच्या बाजूनं उभं राहायचं ठरवलं असेल तर महाराष्ट्र त्याला निश्चितच विरोध करेल. महाराष्ट्राच्या मायभगिनींचा अवमान आम्ही सहन करणार नाही,’ असं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ठणकावलं.

कंगनाला पाठिंबा देणाऱ्या भाजपवरही सावंत यांनी टीकेची तोफ डागली. ‘जी कंगना राणावत महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचा अपमान करते. १०७ हुतात्म्यांचा अपमान करते. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करते. त्या कंगनाला ‘वाय’ सेक्युरिटी दिली गेली. तिला झाशीची राणी ठरवलं गेलं. राज्यपालांशी तिची भेट घडवून आणली गेली. हे सगळं भाजपच्या इशाऱ्यावर आणि स्क्रीप्टनुसार झालं,’ असा आरोपही त्यांनी केला.

‘भाजपनं गेल्या सहा वर्षात महाराष्ट्राचा अपमान करण्याची, महाराष्ट्राला कमी लेखण्याची एकही संधी सोडली नाही. अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर नेण्यात आले. आता बॉलिवूडही बाहेर घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू करणं हे भाजपचं लक्ष्य आहे. भाजपकडून मराठी कलाकारांचा अवमान झाला. त्यांच्या आर्थिक स्थितीची हेटाळणी करण्यात आली हेही लोकांसमोर आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही,’ असा इशारा सावंत यांनी दिला.

Protected Content