एरंडोल, प्रतिनिधी । शहर व रिंगणगाव मंडळात काल दि.२६ जुन रोजी रात्री सव्वानऊ वाजेदरम्यान जोरदार पावसाने आगमन झाले. या पावसाने एरंडोल तथा रिंगणगाव मंडळातील शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी कासोदा व उत्राण मंडळात मात्र गेल्या दहा ते अकरा दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा आहे.
शुक्रवार दि.२६ जुन रोजी झालेल्या पावसात एरंडोल परिसरात ९ मी.मी.,रिंगणगाव परिसरात ३८ मी.मी.,तर कासोदा व उत्राण परिसरात ० मी.मी.पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसापासून तालुक्यात जवळपासब ८० टक्के पेरणी झालेली आहे. शेयकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागुन होते. .पावसाने पाठ फिरवल्याने काही शेतकरी बांधवांनी पेरण्या थांबवल्या होत्या. मात्र शुक्रवार दि.२६ जुनच्या रात्री नऊ ते सव्वा नऊ वाजे दरम्यान जोरदार पावसाचे आगमन झाले. हा पाऊस एरंडोल शहर व रिंगणगाव परिसरात रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होता. गेल्या सात आठ दहा दिवसापासून वातावरणात मोठ्याप्रमाणात उकाडा निर्माण झाला होता. काल रात्री आलेल्या पावसामुळे उकाड्यापासुन सुटका होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दरम्यान एरंडोल तथा रिंगणगाव परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरणपाहावयास मिळाले. आजपासून राहिलेल्या पेरण्या व शेत जमीन मशागतीच्या कामाला गती मिळणार आहे. मात्र कासोदा व उत्राण परिसरातील शेतकऱ्यान पाठोपाठ एरंडोल व रिंगणगाव परिसरातील शेतकऱ्यांना देखील अजुन मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.