एप्रिल अखेरपर्यंत राज्यात कोरोना रुग्णसंख्या 12 लाखांवर जाणार : 30 पट रुग्णसंख्या वाढली

 

 

मुंबई: वृत्तसंस्था । राज्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी सारखी असून एप्रिल अखरेपर्यंत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 12 लाखांवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील व्यापारी संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी ही माहिती उघड झाली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, राज्य टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते.

 

 

राज्यात फेब्रुवारीपासून आतापर्यंत 30 पट रुग्णसंख्या वाढ झाली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 4 लाखांवर पोहचली होती. गतवर्षीच्या सप्टेंबर 2020 मधील रुग्णसंख्येपेक्षा कित्येक पटींनी रुग्ण संख्या झाली आहे. भारत सरकारच्या अंदाजानुसार एप्रिल अखेरीस 12 लाखांवर रुग्णसंख्या पोहचू शकते, असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव व्यास यांनी सांगितलं.

 

राज्यात गंभीर परिस्थिती आहे. विषाणूचा नवा स्ट्रेन त्याचा फैलाव वेगाने करत आहे आणि तो डबल म्युटंट आहे. तो तरुण आणि मुलांना घातक आहे. त्यासाठी विषाणूची साखळी तोडणे हाच यावर उपाय आहे. ही दुसरी लाट त्सुनामीसारखे दिसते आहे. ती रोखण्यासाठी करता येतील, ते सर्व प्रयत्न करावे लागतील, असं टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं.

 

रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही. विषाणूशी लढा आहे. तुम्ही महाराष्ट्राचे भूमीपूत्र आहात. तुमचे नुकसान होऊ देणार नाही. कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते. हे समजून घ्या. न डगमगता यातून बाहेर पडायचे आहे. कोरोनावर मात करायची आहे, हे लक्षात घ्या, असं आवानह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांना केलं.

 

यापूर्वी आपण सामाजिक अंतराचे चौकोन आखले होते. त्यातून परिश्रमाने, मेहनतीने पहिल्या लाटेवर मात केले होते. यात धारावी पॅटर्नचे जगभर कौतूक केले होते. पण आता परिस्थितीच विचित्र झाली आहे. कोरोनाचे हे संकट दुर्देवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची भूमिका नाही, हे यापुर्वीच स्पष्ट केले आहे. कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती. याआधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Protected Content