जळगाव, प्रतिनिधी । शासनाकडून शहराकरिता एनएचएमयु व ग्रामीण भागाकरिता एनआरएचएम राबविण्यात येत असून या कर्मचाऱ्यांचे सुसूत्रीकरणास एप्रिल २०१८ पासून करणेबाबत संबधित महापालिका आयुक्तांना पत्र देण्यात येऊन सुद्धा जळगाव मनपा त्याची दखल घेत नसल्याची तक्रार या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष महानगर अभिषेक पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाने मनुष्यबळ सुसूत्रीकरणास एप्रिल २०१८ पासून लागू करणेबाबत पत्र संबंधित महापालिकेच्या आयुक्त यांना दिलेले आहे. यानुसार जळगाव शहर महापालिकेला सुद्धा हे पत्र प्राप्त प्राप्त झाले आहे. यासंबंधी नसती उपायुक्त यांच्याकडे ठेवण्यात आली असून ती प्रलंबित आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या फरकाची रक्कम अदा करणेसाठी नसती ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर सर्व कर्मचाऱ्यांना फरक अदा करण्यात येईल तरी या गोष्टीस बराचसा वेळ लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाखाली आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवाची व कुटुंबाची देखील पर्वा केली नाही तरी शासनाने मंजूर केलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी महापालिकेने करावी अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महानगर अभिषेक पाटील यांनी या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला ते आरोग्य मंत्री राजेश टोपे व जळगाव मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/765014194359098