एकनाथ खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय — राज ठाकरे

 

पुणे:  वृत्तसंस्था ।  मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत असल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे  यांनी केले.

 

राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असतानाही तेच झाले होते आणि आता भाजपही तेच करत आहे. ईडीसारखी सरकारी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

 

राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते रविवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी ‘ईडी’च्या कारवाईवर तोफ डागत अप्रत्यक्षपणे भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता यावर भाजपचे नेते काही प्रतिक्रिया देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

ईडीला आणखी काही कागदपत्रे हवी होती ती कागदपत्रे 10 दिवसात जमा करण्यास सांगितलं आहे. ईडीला जेव्हा चौकशीसाठी आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही यायला तयार आहोत, असे एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी म्हटले होते.

 

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडले कुठंय?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

 

खूप पूर्वी मराठा मोर्चा निघाला होता. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाऊन मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वांना आरक्षण मान्य होतं. जर सर्वांनाच आरक्षण मान्य होतं तर अडकलं कुठे? की केवळ इश्यू करायचा आहे? मराठा तरुणांची निव्वळ डोकी भडकवायची आहे का?, असा सवाल राज यांनी केला.

 

जे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे. तेच ओबीसी आरक्षणाबाबत आहे. ओबीसींचं आरक्षणही सर्वांना मान्य आहे. तर अडलं कुठे? तुम्ही कोर्टात आरक्षणाची बाजू व्यवस्थित का मांडत नाहीत? एकमेकांकडे बोट का दाखवत आहात? एकदा या सर्वांना एका व्यासपीठावर आणा आणि विचारा, असं ते म्हणाले.

 

Protected Content